Thursday, August 21, 2008

अनुभव..

अनेक दिवसांनी trekking ला जायचा योग आला. गडाच्या पायथ्याशी एका ओळखीच्या मुलीचे घर होते. तिच्याकडे रात्री मुक्काम केला. मुलगी अतिशय कष्टाळू.. गावात घर.. पुण्यात राहून शिकणारी. गावातले घर डोंगराच्या पायथ्याशी.. घरात एकूण माणसे सात..

आजी.. शहरात एखादया दिवशी वीज नसेल तर गॅसवर पाणी तापविण्यासाठई एखादे जड पातेले उचलताना मला त्रास होतो. आजीबाई भराभर चार पाच पातेली चुलीवर चढवत – उतरवत होत्या.

आई.. सर्व मुलींवर सारखीच माया.. आणि अंगात ताप असताना व आम्ही आमचे डबे सोबत नेलेले असताना.. भात, भाजी, पापड, पोळ्या असा एकूण २० माणसांचा स्वयंपाक चूल व स्टोव्ह वापरुन केला. शहरात चार पाहुणे येणार असतील तर काय मेनू करायचा हे चार दिवस ठरत असते आपले..

(सारेगमप या झी मराठी वरील कार्यक्रमात अवधूत गुप्तेने एक जोक केला.. एका मुलीने ’कोण येणार गं पाहुणे’ हे गाणे गायल्यावर अवधूत पल्लवीला म्हणाला.. हे गाणे म्हणणा-या व्यक्तीचे शहर कोणते..

१. पुणे
२. मुंबई
३. कोल्हापूर.

पल्लवीला उत्तर सुचेना.. यावर अवधूत म्हणाला.. पुणे नक्की नाही.. पाहुणे येणार याचा इतका आनंद पुणेकरांना होणे शक्य नाही… )

तर.. घराभोवती शेती.. फ़ुलझाडे, भाज्या.. माझ्या घराभोवती असलेल्या चिमुकल्या बागेत काम करणे मला शक्य होत नाही आणि इकडे प्रपंच, म्हॆस .. पाहुणेरावळे, गावातील एक दुकान सांभाळून ती माऊली शेत पाहात होती.

ज्या मुलीकडे राहिलो ती आरामात डोक्यावर दोन हंडे घेऊन पाणी घेऊन आली.. (लांबून पाणी आणायला लागले तरी ’आम्ही आंघोळी करून गड चढायला का जात नाही अशी आजीबाईंची कुरकुर चालूच होती)..

स्वत:ची लाज वाटावी असे हे अनुभव.