Friday, June 27, 2008

श्रीधर फ़डके यांच्या गाण्यातील पाऊस.. १

रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफ़ुलांनी दरवळणारा श्रावण मी
आकाश पावसाचे ते रंग श्रावणाचे..
ओथंबल्या क्षणांचे
हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फ़िरताना
पाऊसओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना
तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी..
रंगली फ़ुगडी बाई रानात रानात
वाजती पॆंजण बाई तालात तालात
फ़ांदीवरला झोका उंच उंच गं झुलताना
हात तुझा मेंदीचा हळूच पुढे तू करताना
तुझ्या गुलाबी ओठांवरती थरथरणारा श्रावण मी..
पावसातले दिवस अपुले शोधतेस आज जिथे
तुझे नि माझे गीत कालचे ऎकतेस आज जिथे
तिथेच कोठेतरी अजूनही मोहरणारा श्रावण मी
अजूनीच त्या ठिकाणी ती श्रावणओली गाणी
माझी तुझी कहाणी..

गीत: अनिल कांबळे
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : सुरेश वाडकर
अल्बम : तेजोमय नादब्रम्ह

१. अनिल कांबळे व श्रीधरजी यांचे गाजलेले गाणे म्हणजे ‘त्या कोवळ्या फ़ुलांचा बाजार पाहिला मी’..

२. हे वरचे गाणे म्हणजे रोमॅंटिक या सदरातले.. हुरहुर लावणारे.. ती त्याच्या आयुष्यात आता नाही. त्याच्या संसारात तो सुखी असावा.. तीही आहे तिथे सुखात असावी.. पण श्रावणातल्या थेंबांसोबत आठवणी मनाला बिलगतात..
मोरपिसांचा पाऊस यावा
निळसर हिरव्या हळव्या रात्री
स्पर्शलिपीतून लिहिले जावे
हस्तीदंती रेखीव गात्री

त्या अवस्थेत कॉलेजमध्ये असतानाच्या श्रावणातल्या आठवणी आल्या आणि हे गीत बनले. हे दोन वेगळ्या कवितांचे मिळून एक केले आहे. (असावे !).. कारण ‘श्रावण मी’ हे यमक जुळणारी एक कविता आहे व मधल्या काही ओळी दुस-या कवितेतील असाव्यात.. असा प्रयोग श्रीधरजींनी ‘हे गगना’ मध्ये तीन कविता एकत्र करून ‘क्षितीजी आले भरते गं’ मध्ये केला आहे.

३. एकाच श्वासात पहिली व दुसरी ओळ म्हणणे यात अपेक्षित आहे असे मध्यंतरी झालेल्या एका कार्यक्रमात स्वत: श्रीधर फ़डके यांनीच सांगितले.’रंगली फ़ुगडी बाई’ आणि ‘वाजती पॆंजणे तालात’ मध्ये ‘फ़ुगडी’ घालणा-या मुली साक्षात डोळ्यासमोर येतात.. रिमझिम हा शब्द मध्ये या गाण्यात आठ वेळा म्हणला गेला आहे. तो रिमझिम पाऊस भोवताली पडतो आहे असे नीट्पणे ऎकले तर वाटेल.४. सुरेश वाडकर व सहका-यांनी हे गाणे सुरेख गायले आहे. दरवळणारा, थरथरणारा, भिरभिरणारा, मोहरणारा श्रावण साक्षात मनात उभा राहतो. ‘गुलाबी ओठ’ हे शब्द किती गुलाबी मुलायमपणे म्हणले गेलेत ते ऎकूनच कळेल.. ‘ये आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते हॆ’ या गाण्यातला सुरेश वाडकर यांचा आवाज आठवतो.

५. गच्च भिजलेले रान, थेंबाथेंबात दाटलेला पाऊस, हिरव्या मखमली वाटा.. एकटाच आठवणी मनात घेऊन फ़िरणारा तो.. असे शब्दचित्र शब्द, सूर व गीत यांच्या माध्यमातून सहज उभे राहाते..

६. तिनेही जर हे गीत ऎकले तर ..
देह झाला कस्तुरीचा केवडाही घमघमे
इथे तिथे ठायीठायी गंधभारला पाऊस..

अशीच तिची अवस्था होईल..

आकाशात फ़ुललेली
मातीतील एक कहाणी
जो प्रवास सुंदर होता
आधार मातीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आकाश माथ्यावरती
सुख आम्रासवे मोहरले
भोवताल सुगंधी झाले
शून्यामधली यात्रा
वा-यातील एक विराणी
गगनात विसर्जित होता
डोळ्यात कशाला पाणी..

कुसुमाग्रज

याच कवितेतील भाव ‘रोज तुझ्या’ मधे आहे. ती श्रावणओली कहाणी ऎकून मनातल्या सुप्त तारा झंकारतात. सुखद आठवणींचे सूर उमटून एक हलकेसे स्मित ओठांवर येते..

‘मेरे दुश्मन तू मेरी दोस्तीको तरसे’ वगॆरे गाण्यांमधला शाप या गाण्याला नाही. ‘हॆ दुनिया उसीकी जमाना उसीका मुहोब्ब्त में जो हो गया हो किसीका’.. असे शांतपणे स्वीकारणा-या वृत्तीचे हे गाणे आहे..

1 comment:

Nitin Kulkarni.... said...

Great.... khup sunder ... keep it up.....