Tuesday, December 30, 2008

Fire of Hiroshima - Marathi
Jonathan Livginston seagull - Marathi
Light the lamp within - Marathi
Rats - Marathi
Three Days to see - Marathi
Web of Life -(Marathi)
positivism - by R. Mashelkar

Monday, December 22, 2008

काळे गाणे

१ Best poem nomination for २००५

When I born, I black,
When I grow up ,i black,
When I go in Sun, I black,
When I scared, I black,
When I sick, I black,
And when I die, Im still black,

And u white fella,
when u born, u pink,
When u grow up, u white,
When u go in sun, u red,
When u cold, u blue,
When u scared, u yellow,
When sick, उ green,
And when u die, u gray,
And u calling ME coloured???

२ On a British Airways flight from Johannesburg, a middle-aged, well-off white South African Lady has found herself sitting next to a black man। She called the cabin crew attendant over to complain about her seating। "What seems to be the problem Madam?" asked the attendant। "Can't you see?" she said " You've sat me next to a kaffir. I can't possibly sit next to this disgusting human. Find me another seat!" "Please calm down Madam." the stewardess relied. "The flight is very full today, but I'll tell you what I'll do-I'll go and check to see if we have any seats available in club or first class." The woman cocks a snooty look at the outraged black man beside her (not to mention many of the surrounding passengers). A few minutes later the stewardess returns with the good news, which she delivers to the lady, who cannot help but look at the people around her with a smug and self satisfied grin: "Madam, unfortunately, as I suspected, economy is full. I've spoken to the cabin services director, and club is also full. However, we do have one seat in first class." Before the lady has a chance to answer, the stewardess continues ... "It is most extraordinary to make this kind of upgrade, however, and I have had to get special permission from the captain. But, given the circumstances, the captain felt that it was outrageous that someone be forced to sit next to such an obnoxious person." With which, she turned to the black man sitting next to the woman, and said: "So if you'd like to get your things, sir, I have your seat ready for you..." At which point, apparently the surrounding passengers stood and gave a standing ovation while the black guy walks up to the front of the plane.
people will forget what you said .... people will forget what you did .... but people will never forget how you made them feel.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे काल सकाळ मध्ये मुक्ता मनोहर यांचा मरियम मकेबा यांच्यावर लेख आहे. मरियम मकेबा यांच्या आत्म्चरित्राचा मराठी अनुवाद ’काळे गाणे’ सुमारे १० वर्षांपूर्वी वाचला होता. साऊथ आफ़िकेतील चालीरीती, अंधश्रध्दा आणि काळ्या वर्णासाठी व एक स्त्री म्हणून अशा दोन्ही पातळ्यांवर मरियम मकेबा यांनी किती लढा दिला हे त्या पुस्तकात प्रभावीपणे मांडले आहे.

एक होता कार्व्हर या पुस्तकातही कार्व्हर यांना काळे असण्याचा कसा त्रास सहन करावा लागतो हे येते.

मरियम मकेबा ११ नोव्हेंबर २००८ रोजी एका गाण्याच्या कार्यक्रमात असताना गेल्या. पुस्तकाची आठवण आली त्यानिमित्ताने हे लिखाण.

Friday, December 19, 2008

ATM व कही दूर जब दिन ढल जाये


ATM मधून पॆसे काढले. बाहेर आले तर एक college मधील मॆत्रिण दिसली. अनेक वर्षांनी भेटत होतो. त्यामुळे एकदम “तू, कुठे होतीस, आज इकडे कुठे” वगॆरेचा हलकल्लोळ झाला. (तोपर्यंत

तिचा सोबत असलेला नवरा पुतळा होऊन उभा होता…..!!)

मग एकदा भेटू, तो / ती आजकाल कुठे असते याची चौकशी व मोबाईल नं. ची देवाणघेवाण होऊन ती भेट संपली. मग दोन दिवसांनी माझ्या मोबाईलवर एका मुलीचा आवाज, “काय ओळखलंस का?” मी लगेच तिचा आवाज ओळखून तुला नंबर कोणी दिला तेही लक्षात आले असे सांगितले. मग एकदा असे सगळे college मधील चार-पाच जण भेटलो.

त्यातल्या एका मित्राचा भेटीनंतर दोन दिवसांनी फ़ोन आला. म्हणाला, मध्यंतरी कपाट आवरताना जुन्या वह्या सापड्ल्या. त्यातील chemistry च्या वहीत ’कही दूर जब दिन ढल जाये’ हे तू लिहून सुवाच्च अक्षरात लिहून दिलेलं गाणं सापडलं. खूप छान वाटलं.

मी ती वही, त्यातील गाणं सगळंच अर्थात विसरले होते. या निमित्ताने मग अनेक आठवणी काढल्या.

आनंद या सिनेमामधील हे गाणं सगळ्यांना आवडतं.. पण मला त्याहून जास्त आवडतं ते ..

मौत तू एक कविता हॆ
मुझसे एक कविता का वादा हॆ मिलेगी मुझको
डूबती नब्जोंमें जब दर्द को नींद आने लगे
जर्द सा चेहरा लेकर जव चांद उफ़क तक पहुंचे
दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन
जिस्म जब खत्म हो और रुह को जब सांस आये
मुझसे एक कविता का वादा हॆ मिलेगी मुझको…

Monday, December 15, 2008

अस्वस्थ अक्षरांच्या गर्दीत हिंडताना…


भल्या पहाटे सिंहगड चढलो.. चंद्र आकाशात दिसत होता. मस्त वाटले. वर जाऊन नेहमीप्रमाणे खेकडा भजी, दही, भाकरी, पिठलं खाल्लं. उतरायला सुरुवात केली. ८-१० वर्षाची २०-२५ मुलेमुली दिसली. कुठून आली आहेत विचारल्यावर रायगड असे कळले. त्यातल्या एका मुलीच्या हातात जड सामान, दुस-या हातात ओढणी.. मग माझा सोबती तिला म्हणाला.. चिमणे, तुझी ओढणी बांधून देतो. त्याने मस्तपॆकी तिच्या कमरेला ओढणी नीट बांधली. आता जरा तिला चढणे सोपे जाईल..

पुढे गेलो तर अजून एक बालचमू.. उरणहून आलेत असे कळले. समारंभाला जावे तसे पोशाख करुन सर्वजण आले होते. पुढे गेलो तर त्या मुलांच्या शिक्षिका एका माणसाचे आभार मानताना दिसल्या. त्या माणसाला सिंहगडाच्या पायथ्याशी एक चिमुकली पर्स सापडली होती. शाळेतील मुलीची होती असे सांगणारे कोणी भेटले. मग तो आत्ताच उतरुन गेला होता तरी परत चढायला लागला. साधारण १/३ वर चढल्यावर भेट्लेल्या त्या शिक्षिकेने ती पर्स ओळखली. त्यात ३० रुपये होते. त्या माणसाशी बोलल्यावर तो म्हणाला.. आपण शाळेत असताना ५ रुपये सुध्दा आपल्याला किती होते. मग त्या मुलीला हे ३० रुपये महत्वाचे असणार, या विचाराने मी येथपर्यंत आलो।
रोजच्या वर्तमानपत्रातील पॆशासाठी खून, मारहाण, फ़सवणूक इ. बातम्या वाचतो. या अनुभवाने रविवार एकदम आनंदात गेला. असेही अजून घडते तर.. !

Saturday, December 13, 2008

Not one less.. एकसुध्दा कमी नको.



चीनमधील डोंगराळ भागातील एक गाव – शुइजियान। कोणत्याही खेडेगावासारखे नापिक जमिनीने व दारिद्र्याने गांजलेले। गावची लोकसंख्या जेमतेम हजारभर आहे। गावातले लोक मोलमजुरी करतात। मिळेल ते आणि मिळाले तर खातात, अगदीच नाही तर जवळच्या शहरात निघून जातात. मागे उरतात ती मजुरी करायला निरुपयोगी - म्हातारी माणसे व लहान मुले.

गावात म्हणायला एक प्राथमिक शाळा आहे। तुटके गळके छप्पर, मोडकळीस आलेले बाक आणि त्यासारखेच गरिबीने वॆतागलेले मास्तर। त्यांच्या चेह-यावरच्या सुरकुत्यात आणि कपाळावरच्या आठ्यात ते स्पष्ट दिसते॥ शाळेत एकच वर्ग आहे आणि सर्व इयत्तांमधील मुले पॆशाअभावी त्या एकाच वर्गात बसतात. त्यातील चार-पाच मुले मास्तरांबरोबरच राहतात. मुलांना खायला मिळायचा खर्च निघावा म्हणून मास्तर खडू सुध्दा जपून वापरतात. अक्षरे लहान काढतात. यात भर पडते ती त्यांची आई आजारी आहे म्हणून निरोप आल्यावर॥ त्यांच्या जागी शाळेतील २८ मुलांना शिकवणार कोण ? सहा सहा महिने पगार न मिळणा-या शाळेत स्वत:हून नोकरीवर कोण येणार ? त्यात कायदे कडक आहेत. बदलीचा शिक्षक आल्याशिवाय ते सुट्टीवर जाऊच शकत नाहीत.

गावचा सरपंच शेजारच्या गावातील एका १३ वर्षांच्या मुलीला तयार करतो. तिचे नाव वेई मिंजी. शिक्षक तिला पाहून चकितच होतात. वेई स्वत: माध्यमिक शाळेत गेलेली नाही. माओची स्तुती करणा-या गाण्याच्या दोन ओळी सोडल्या तर तिला फ़ारसे काही येत नाही. मात्र तिला पुस्तकातून पाहून नीट लिहिता येते. बस्‌.. एवढ्या पात्रतेवर शिक्षक तिला तिचे काम व २६ दिवसांचे २६ खडू देऊन निघून जातात. उन्हे वर येईपर्यंत मुलांना गुंतवून ठेवण्याचा मौलिक सल्ला मात्र तिला देतात.

वेई त्यांना विचारते की “उन पडलेच नाही तर”.. ती स्वत: किती अननुभवी आहे आणि निरागस आहे हे या प्रसंगात दिग्दर्शकाने उत्तम दाखविले आहे.

याच संभाषणात पुढे मास्तर सांगतात की ते परत येईपर्यंत एकही विद्यार्थी कमी झालेला नको.. not one less..

मिंजीचा ४० युआन पगार कोण देणार हे मात्र सरपंच व मास्तर दोघेही सांगत नाहीत. सांगतात एकच ’सर्व विद्यार्थी मास्तर सुट्टीवरुन परत येईपर्यंत टिकून राहिले तर ते १० युआन बक्षीस देतील.”

शिक्षिकेला अनुभव नाही व मुले तर मुलेच आहेत. व्रात्य आणि दंगेखोर. मिंजी त्यांनी गिरवण्यासाठी फ़ळाभरुन छोटी छोटी अक्षरे काढते व बाहेर जाऊन बसते. मोकळी सुटलेली मुले थोडाच अभ्यास करणार आहेत ? ती भांडण सुरुच करतात, वेण्या ओढणे, चिमटे काढणे सुरु. मिंजीला सांगतात.. फ़ळ्यावर लिहिलेले आम्हाला समजत नाही. ती म्हणत राहाते.. “लिहा”. (शिक्षणपध्दतीवर प्रकाश टाकणारा हा सीन आहे.) मुलांच्या दंग्यावर आणि तक्रारींवर तिच्याकडे एकच उत्तर आहे. ते म्हणजे “लिहा”.. तीही काही कमी हट्टी नाही.

झांग हुईके हा सर्वात जास्त व्रात्य मुलगा आहे. वर्गात काही चांगले विद्यार्थी आहेत. व्रात्य मुलेही मनाने चांगली आहेत. मात्र मुले सहजासहजी नवीन शिक्षिकेला स्वीकारायला तयार नाहीत. व्रात्य मुले व हट्टी शिक्षिका यांच्या भांडणात वर्गातील डुगडुगणारे टेबल पडते त्यावरचे खडूही.. खडूंवर पाय पडताच त्यांची जी काही अवस्था होते ती आधी मिंजीच्या लक्षातच येत नाही. आणि लक्षात आल्यावर तिच्या हातावर मुलांचे पाय पडत असताना ती जिवाच्या आकांताने खडू गोळा करते.

दुस-या दिवशी वर्गात परत दंगा होतो. आज कुरापती झांगने मिंगची डायरी पळवली आहे. आणि तो तिने कितीही नकार दिला तरी ती डायरी सगळ्या वर्गासमोर वाचतो आहे. आपली वॆयक्तिक डायरी वाचलेली कोणाला आवडेल ? आत्तापर्यंत लिहा हे एकच उत्तर देणारी मिंजी यावर निर्णय देते ’वाचा’
डायरीत कालच्या प्रसंगाचे वर्णन लिहिले आहे. खडू कसे तुटले ? आधीचे शिक्षक कसे खडू पुरवून वापरत. आपली शाळा किती गरीब आहे. शिक्षिका सगळ्यांना वठणीवर का आणत नाही ?

तिस-या दिवशी वेई मिंजीच्या लक्षात येते की तिचा उनाड विद्यार्थी वर्गातून गायब आहे. इतर मुलांकडून तिला कळते की तो झीमेई नावाच्या मुलीसोबत काम मिळवण्यासाठी शहरात गेला आहे. झांग हुइकेला वडिल नाहीत आणि आई फ़ार आजारी आहे. कुटुंबावर फ़ार कर्ज असल्याने हुईकेला ’असल्या’ शिक्षणापेक्षा कामातून मिळणारे पॆसे जास्त महत्वाचे आहेत. त्याची रोजगाराची गरज वगॆरे मिंजीच्या लक्षात येत नाही. तिच्या लक्षात आहे ती फ़क्त मास्तरांची धमकी.. ’एक सुध्दा कमी नको’ Not one less..

गावचा सरपंच हे सगळे झटकून देतो. आता शहरात जाऊन हुईकेला हुडकून आणण्याची जबाबदारी घ्यायला हवी. मिंजी ठरवते की तीच शहरात जाईल. शहरात जाणे तसे अवघड नव्हते. पण बसच्या तिकीटासाठी पॆसे तर लागणारच. आणि एक नाही तर तीन तिकीटांसाठी… जाण्याचे एकाचे आणि येताना दोघांचे. मिंजीकडे अंगावरचे कपडे व उरलेल्या खडूंपलीकडे काही नाही. शहरात जाण्याच्या
खर्चाचा अंदाज कोणालाच नसतो. एका विद्यार्थ्याने सांगितले की काही वर्षांपूर्वी तो आईसोबत शहरात गेला होता तेव्हा तीन युआन तिकीट होते. नऊ युआन मिळवण्यासाठी सर्व विद्यार्थी आपल्याकडे आहेत-नाहीत ते सर्व पॆसे शिक्षिकेकडे आनंदाने देतात. आता उरलेले पॆसे कुठून आणायचे या विषयावर सर्व वर्ग गंभीरपणे विचार करतो. त्यातल्या एकाला सुचते की बाजूच्या विटा बनवायच्या कारखान्यात मजुरी करावी. जशी मुले.. तशीच शिक्षिका.. सगळे उत्साहाने विटांच्या कारखान्यात जाऊन धडकतात आणि काही विचारपूस न करता विटा इकडून तिकडे उचलून ठेवतात. काही विटा पडतात.. काही तुटतात. कोलाह्ल ऎकून तेथील मॅनेजर येतो आणि या वानरसेनेची कामगिरी पाहून बुचकळ्यात पडतो. पण त्यांची समस्या ऎकल्यावर दया येऊन तो दहा युआन देतो.

आता मिंजीकडे बसभाड्यापेक्षा जास्त पॆसे जमा होतात. तिच्यातील शिक्षिका जागी होऊन विचार करते की सगळ्या चमूची तहान भागवायला हवी. ती सुध्दा विदेशी थंड पेयांनी, जे त्यांनी आजवर फ़क्त जाहिरातीतच पाहिले होते. पण लक्षात येते की मिंजीकडे असलेल्या पॆशातून फ़क्त दोनच टिन परवडणार होते. मग सगळी मुले आपापल्या वाट्याला आलेला एकेक घोट घेऊन तृप्त होतात.

आपल्या शिक्षिकेला सोडायला सगळी मुले बसस्थानकावर जातात. पॆसे मिळवण्याची सगळी खटपट ऎकीव गोष्टींवरुन व गणिताच्या अर्धवट ज्ञानावर केलेली असते. त्यामुळे बसस्थानकावर पोहोचल्यावर लक्षात येते की जवळ्च्या पॆशात तीन काय एकसुध्दा तिकिट परवडणार नाही. मग असे ठरते की मिंजीने विनातिकिट बसमध्ये चढायचे.

मुले विचार करतात की सगळे एकदम बसमध्ये चढले तर कंडक्टर त्यांच्या तिकीट नसलेल्या शिक्षिकेपर्यंत पोहोचणारच नाही. पण त्यांची ही युक्ती सफ़ल होत नाही. त्या सगळ्यांना तेथेच उतरवले जाते तर त्यांच्या शिक्षिकेला गावाबाहेर.. पण मिंजी आता अजिबात मागे फ़िरत नाही. ती चालत चालत शहराच्या दिशेने निघते.

मोठ्या शहराचा झगमगाट पाहून मिंजी घाबरत नाही. इकडे तिकडे विचारत ती झांग हुईकेच्या पत्त्यावर जाऊन पोहोचते. हुईके ज्या मुलीबरोबर झीमेईसोबत गावातून आलेला असतो, ती मिंजीला नवीन संकटात टाकते ; हुईके त्याच्या व्रात्य स्वभावामुळे रेल्वे स्टेशनवरच हरवला असे ती मिंजीला सांगते.

आता मिंजी आणि झीमेई तीन दिवसांपूर्वीच हरविलेल्या हुईकेला प्लॅटफ़ॉर्मवर शोधायला लागतात. मित्रपरिवारातू हरवल्यावर हुईके थोडाच प्लॅटफ़ॉर्मवर थांबणार ? तो बाहेर पडून शहरात भटकायला निघतो. भुकेने व्याकुळ होऊन तो एका हॉटेलमध्ये सामोसे, मिठाईकडे आशाळभूत नजरेने पाहत असतो. त्याच्या अशा फ़िरण्याने ग्राहक निघून जाऊन नयेत म्हणून त्या हॉटेलची मालकीण त्याला पोटभर खायला देते व छोटीमोठी कामेही सांगते.

इकडे स्टेशनवर एकट्या बसलेल्या मिंजीला एक स्त्री सुचवते की हुईके हरवल्याची बातमी एका कागदावर लिहून तो कागद स्टेशनात चिकटवला तर उपयोग होऊ शकेल. मिंजी आपल्याकडचे सर्व पॆसे खर्च करुन कागद, पेन व शाई आणते. रात्रभर जागून ती शंभरएक कागदांवार हुईके हरवल्याची बातमी लिहिते. स्टेशनवरचा एक प्रवासी ते पाहून पुटपुटतो की पाणी घालून पातळ केलेल्या शाईने लिहिलेला मजकूर कोण वाचणार आणि त्यात पत्ता तर लिहिलेलाच नाही. कोणाला मदत करावीशी वाटली तर तो/ती संपर्क कुठे साधणार ? थकल्या भागलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या मिंजीला तर काहीच सुचेनासे होते. कोणीतरी योग्य मार्ग सुचविला तर तो ती अमलात आणू शकते. सल्ला द्यावा म्हणून ती त्या प्रवाशाच्या मागेच लागते. तिला टाळण्यासाठी तो टेलिव्हिजनकडे जायचा मार्ग सुचवितो.

आता बिचारी मिंजी येणा-या जाणा-यांना टेलिव्हिजन केंद्राचा पत्ता विचारायला लागते. एक खेडवळ मुलगी टेलिव्हिजन स्टुडिओच्या ऒफ़िसमध्ये पोहोचून करणार तरी काय ? कोणी तिचे म्हणणे कशाला ऎकेल ? मिंजीकडे ना जाहिरात द्यायला पॆसे आहेत ना शिफ़ारसपत्र, ना ती शिक्षिका असल्याचा दाखला. ती रिसेप्शनिस्ट च्या पुढे कोणापर्यंत पोहोचूच शकत नाही. रिसेप्शनिस्ट या ब्यादीला कंटाळून संचालकांना भेटायला सांगते. पण ऒफ़िसमध्ये आत जाऊन नाही तर गेट्च्याबाहेर उभे राहून.. आता चौकीदार ही तिला बाहेर घालवून देतो.

झाले.. मिंजी आता टेलिव्हिजन केंद्राच्या बाहेर येणा-या जाणा-यांना थांबवून विचारायला लागते की ते या केंद्राचे संचालक आहेत का ? चौकशी करण्यातून कोणी सुटू नये म्हणून ती सायकलवाल्यांचा लांबवर पाठलाग करुन हा प्रश्न विचारते. संध्याकाळ होते. रात्री गार वा-याने तिचे कागद उडून जातात व पहाटेच्या काळोखात सफ़ाईसाठी आलेले कामगार ते कागद कचरा म्हणून घेऊन जातात.

मिंजी थंडीत गारठून झोपलेली असते. सकाळ झाल्या झाल्या जवळच्या नळावर तोंड धुवून ती परत केंद्राच्या आयुक्तांना शोधायची मोहीम चालू ठेवते.

दुपारनंतर संचालकांना कोणीतरी सांगते की एक गरीब, ग्रामीण मुलगी दीड दिवस त्यांना शोधते आहे. ते खिडकीतून बाहेर डोकावतात. एक दुबळी, लाचार मुलगी येणा-या जाणा-यांमागे चौकशी करताना दिसते. ते हॆराण होतात. नियमावर बोट ठेवून काम करणारे लोक माणुसकी पूर्णपणे विसरुन गेले होते की काय ? त्यांना आधीच हे कोणी का सांगितले नाही म्हणून रागावतात देखील. आता संचालक स्वत: जाऊन मिंजीला घेऊन येतात.

तिला तर परमेश्वर भेटल्यासारखा आनंद होतो. एका विशेष कार्यक्रमाद्वारे कॅमे-याच्या लेन्समध्ये बघत हुईकेल परत येण्याचे आवाहन करताना तिला रडू फ़ुटते. तिचे आवाहन दर्शकांच्या व हॉटेलमध्ये भांडी घासणा-या हुईकेच्या मनाला स्पर्शून जाते.

तर वाचकहो, गोष्ट तशी बरीच मोठी आहे. पण थोडक्यात सांगायचे तर शेवटी शिक्षिकेला आपला हरवलेला विद्यार्थी परत मिळतो. इतकेच नव्हे तर टेलिव्हिजन वरील कार्यक्रमामुळे शाळेसाठी भेटवस्तू, फ़र्निचर व पॆसेसुध्दा मिळतात. फ़ुलांनी मढलेल्या गाडयांच्या काफ़िल्यात मिंजी व हुईके टेलिव्हिजनच्या लोकांसोबत गावी परत येतत. तेव्हा सगळे आश्चर्यचकित होतात. त्यांच्या स्वागतासाठी सर्वात पुढे असतो तो गावचा सरपंच.. ज्याने शिक्षिकेला शहरात जायला मनाई केली होती. मिंजीच्या ऎवजी तो सरपंच गावात गेला असतात तर जरी हुईके सापडला असता तरी त्याचे मन पालटून तो परत आला असता का ? त्याला भेटवस्तू व आर्थिक मदत मिळाली असती का ?

हा प्रवास तर मिंजीनेच करायला हवा होता. यामुळेच तिच्या हट्टी स्वभावाचे रुपांतर आपले ध्येय ठामपणे साध्य करणा-या स्वभावात होणार होते. विद्यार्थ्यांचे या मुलीशी मनाने नाते आधीच जुळले होते. पण ती त्यांची शिक्षिका बनायला या सर्व घटनांमुळे पात्र होते. परिस्थितीमुळे करावी लागलेली नोकरी तिला आयुष्यभराचे धडे देऊन जाते. भले तिला दहा युआन मिळणार होते पण आव्हानांबरोबरच तिचे ध्येय ठरत जाते. महिन्याभरात आपल्या कम्युनिटीत परतलेली मिंजी आता एक अल्लड तरूणी रहात नाही.

Not one less.. हा चिनी सिनेमा सत्यघटनेवर आधारित असल्याचा दावा करत नाही. पण प्रत्यक्ष असे वेळ पडल्यास करण्याची प्रेरणा नक्की देतो. चमकदार पोशाख. गाजलेले अभिनेते याऎवजी धुळीने भरलेली रखरखीत दृश्ये असूनही हा सिनेमा आपल्याला खुर्चीला खिळवून ठेवतो. याचे निर्देशक झांग यिमू यांना Raise the red lantern या सिनेमासाठी देखील नावाजले गेले आहे.


हा सिनेमा बघितल्यावर एका कवितेची आठवण आली. जी पद्मा गोळे यांची आहे.

पांढरे निशाण उभारण्याची,
घाई करु नकोस,
मूठभर हृदया,
प्रयत्न कर,
तगण्याचा, तरण्याचा,
अवकाश भोवंडून टाकणा-या,
या प्रलंयकारी वादळाचाही,
एक अंत आहे,
काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत,
लढत राहा,
तुझ्या नाजूक असित्वानिशी,
वादळे यासाठीच वापरायची असतात,
आपण काय आहोत,
ते तपासण्यासाठी नव्हे,
काय होऊ शकतो,
हे आजमावण्यासाठी.

Monday, December 8, 2008

झिहाल- ए-मुस्किन

झिहाल- ए-मुस्किन मुकों बा रंजिश, बहाल-ए-हिजरा बेचारा दिल हॆ
सुनायी देती हॆ जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल हॆ

या गाण्यातील पहिल्या ओळीबाबत फ़ार कुतूहल होते. कारण या गाण्याचे गीतकार आहेत गुलजार.. पण पहिली ओळ गुलजारच्या typical शॆलीतली वाटत नव्हती.. व कळत तर अजिबातच नव्हती.

तर माहिती मिळाली ती अशी की ही ओळ सूफ़ी कवी आमिर खुस्त्रो यांच्या एका रचनेवरुन घेतली आहे.

झिहाल- ए-मुस्किन मुकों-बा रंजिश, बहाल-ए-हिजरा बेचारा दिल हॆ
याचा अर्थ आहे..
झिहाल = लक्ष देणे.
मिस्किन = गरीब.
मुकों = नकार
बा-रंजिश = दुष्ट हेतू, शत्रुत्व
बहाल = ताजा.
हिजरा = विरह

याचा एकूण अर्थ : बिचा-या त्या हृदयाकडे लक्ष दे आणि त्याच्याकडे शत्रुत्वाने पाहू नकोस. ते विरहाच्या जखमांनी विध्द झालेले आहे.

दर्द जब तेरी अता हॆ तो गिला किससे करे
हिज्र जब तूने दिया हॆ तो मिला किससे करे

या आशा भोसले यांनी गायलेल्या गझल मध्ये ही विरहाचे वर्णन आहे. सूफ़ी संतांच्या रचनांमध्ये प्रेम व अल्ला या दोघांनाही ब-याचशा रचना लागू पडतात. यात एक अर्थ अल्लापासून लांब गेलेला (त्याचा विरह झालेला) असाही असू शकतो.

Sunday, December 7, 2008

वाटा..


रस्ता हे प्रतीक घेऊन आयुष्याबद्दल अनेकांनी लिहिलं आहे. नेहमी रोज जाणवते ते म्हणजे…

तसा सरळही नसतो रस्ता
नशीबही नसते सरळ तसे
कळतही नाही ऋतूसारखे
बदलत जाती दिवस कसे..

गुलजार यांच्या कवितेत लिहिल्याप्रमाणे ..( येथे ’गुलजार बोलतो त्याची कविता होते’ या वाक्याची अपरिहार्य आठवण येते.. ) आपण एका कोणत्या तरी रस्त्यावरुन कायम चालत असतो.

सहरा की तरफ़ जाकर, इक राह बगूलों में खो जाती हॆ चकराकर
रुक रुकके झिझकती सी, इक मौत की ठंडी वादी में उतरती हॆ
इक राह उधडती सी, छिलती हुई काटों से, जंगल से गुजरती हॆ
इक दौड के जाती हॆ और कुदके गुजरती हॆ, अनजानी खलाओं में

उस मोड पे बॆठा हूं, जिस मोड से जाती हॆ हर इक तरफ़ राहें………

.. ’अनजानी खलाओं में’ जाणा-या वाटेवरुन चालताना

चलते रहते हॆ के चलना हॆ मुसाफ़िर का नसीब
किसको मालूम किधर के हॆ, कहां के हम हे ?

असेच कायम वाटत रहातं.

अनेकदा एकटेपणाची जाणीव होते. कित्येकदा तर एका प्रखर सत्याची जाणीव घेऊन दिवस उजाडतो. अत्युच्च आनंदाच्या किंवा अतिशय दु:खाच्या क्षणी,, खूप समर्थ आणि खूप असहाय्य वाटणा-या क्षणांत , तुमच्या विचारांत, तुमच्या कृतीत, स्वप्नात, जन्मताना, जगताना आणि मरताना आपण एकटे असतो. परत एकदा गुलजारच्या शब्दात..

किस कदर सीधा, सहल साफ़ हॆ रस्ता देखो
न किसी शाख का साया हॆ न दीवार की टेक
न किसी आंख की आहट
न किसी चेहरे का शोर
दूर तक कोई नही, कोई नही कोई नही

किस कदर सीधा, सहल साफ़ हॆ रस्ता देखो..

रोजच्या धावपळीत, नातेवाईक, सहकारी, यांच्याशी वागताना, ट्रीपला गेल्यावर, कॉफ़ीची order देऊन चहा आल्यावर, खूप आनंदाची बातमी घेऊन घरी गेल्यावर शेजारचा तरूण मुलगा गेल्याचे कळल्यावर एकच कळते की..

किसी के वास्ते राहॆ कहा बदलती हॆ
तुम अपने आप को खुद ही बदल सको तो चलो

यहां किसी को कोई रास्ता नही देता
मुझे गिराकर अगर तुम संभल सको तो चलो

व्यंकटेश माडगूळकर यांनी इतक्या नेटक्या शब्दात एका रस्त्याचे शब्दचित्र काढले आहे.

दोन्ही बाजूला दाट जंगल आणि मधूनच जाणारा हा तांबडा रस्ता म्हणजे जलरंगातले एक सुंदर निसर्गचित्र होते. इथल्या हवेला झाडांच्या मोहोराचा, मोहाच्या फ़ुलांचा, गवताचा मंद सुवास असे आणि नाना पाखरांच्या सकाळच्या कूजनाचा नाद असे. बाकी सर्वत्र शांत, प्रसन्न. भल्या सकाळी उठून एखादे ताजे वृत्तपत्र वाचावे तसा हा रस्ता मी वाचत असे. मोठमोठी शीर्षके असत. काल रात्रीपासून भल्या पहाटेपर्यंत घडलेल्या घटनांचा वृतांत इथे वाचायला मिळे.”


त्यापुढे ते म्हणतात..

तो रस्ता मी ताज्या वर्तमान पत्रासारखा वाचला आणि वाटा धुंडताना रहस्यकथेच्या पानातून वावरलो. सुतानं स्वर्गाला कसे जाता येतं ते ह्या वाटांनी मला दाखविले. काहीही मिळवायचं म्हणजे वाटा या तुडवाव्या लागतातच.”

शेवटी उरते ते एकच…………..

गम हो के खुशी दोनों कुछ देर के साथी हॆ
फ़िर रस्ता ही रस्ता हॆ हंसना हॆ ना रोना हॆ

पाऊस - अमेरिकेतला


प्रिय सरो,

समजलं,

आई अत्यवस्थ आहे,

पण इथे पाऊस लागलाय,

पाऊस आमेरिकेतला

तुला काय समजणार म्हणा,

मी इथून निघणार कसा ?

पण आईच्या म्रुत्यूची व्हिडीओ कॅसेट नक्की पाठव,

शेवटच्या आचक्यापासून क्रियाकर्मापर्यंत सगळं अगदी व्यवस्थित नोंदव,

इथल्या मित्रांना अंत्यविधी आवडतो,

भारतीय लग्न, लग्नाची पार्टि, मधुचंद्र,घटस्फ़ोट,सती,असलं सगळं पाहून झालंय,

श्वास थांबल्यानंतरचं क्रियाकर्म जसं प्रेताला आंघॊळ घालणं,कोरे कपडे चढविणं, तोंडात भाताचा गोळा ठेवणं, अग्नी देणं, मडकं फ़ोडणं,

असलं अजून नाही पाहिलं म्हणून पहायचंय,

पण ब्लॅक आणि व्हाईट आणि रंगीत अशा दोन्ही कसेट वेगवेगळ्या काढा,

ब्लॅक आणि व्हाईट आवड्ते मर्लीनला,

जॅक्लीनच्या मते कलरशिवाय 'चिता-फ़िल्म' ला काय मजा,

व्हिडीओवाला आधीच बुक कर

वेळेवर व्हिडीओ मिळाला नाही,

किंवा आईनं वेळ दिला नाही,

कुठलीच सबब ऎकणार नाही,हवं तर चांगली कॅसेट मी इथून पाठवितो,

पाऊस नसता तर मी सुध्दा आलो असतो,

कॅसेट उत्तम बनली पाहिजे खूपजणांना पाहायची इच्छा आहे..

'दि लास्ट मोमेंट्स आफ़ इंडियन मदर',हेच टायटल ठीक वाटेल नाही तर लग्नाची कॅसेट वाटेल,

दुखवट्याला आलेल्यांच्या चेह-यावरुन कॅमेरा फ़िरव,

ख्रिसमसला खूप मित्र जमतील कॅसेट बघतील॥

त्याआधी पाठव,

कॅसेट मिळाल्यावर बाकीच्या गोष्टी आईला जमवून घ्यायला सांग,

ख्रिसमसच्या आधी,

तिलासुध्दा दे खबर पावसाची,

घे काळजी

तुझा ,अमेरिकन दादा.


-अय्यप्पा पणीकर




Wednesday, December 3, 2008

हलका हलका उंस हुआ…

’दिल से’ हा सिनेमा प्रथम बघताना ’सतरंगी रे’ या गाण्याने फ़ार लक्ष वेधले गेले. त्यातल्या उंस (हलके हलके उंस हुआ) या शब्दाबद्द्ल कुतूहल वाढल्याने जरा नेटवरुन माहिती घेतली तर जे काय हाती लागले ते मांडते आहे..

यातले सात रंग म्हणजे प्रेमाच्या सात पाय-या (टप्पे म्हणाले तर त्यात सरळ रेषा येते पण चढत जाणे येत नाही.. असो) आहेत ज्या या सिनेमात रंगविल्या आहेत.

१. हब = आकर्षण
२. उंस = ओळख
३. इष्क = प्रेम
४. अकीदत = आदर
५. इबादत = पूजा
६. जुनून = भारुन जाणे, झपाटणे (जुनून चा एक अर्थ उठाव असा आहे.. जो शशीकपूरच्या जुनून चा आहे)
७. मौत

आता ते गाणे

तू ही तू तू ही तू सतरंगी रे, तू ही तू तू ही तू मनरंगी रे
दिल का साया हमसाया, सतरंगी रे मनरंगी रे
कोई नूर हॆ तू क्यूं दूर हॆ,तू, जब पास हॆ तू एहसास हॆ तूकोई ख्वाब या परछाई हॆ, सतरंगी रे..

इस बार बता मुंहजोर हवा ठहरेगी कहां

इश्क पर जोर नहीं हॆ यह वो आतिश गालिब
जो लगाये ना लगे और बुझाये ना बने

आंखोंने कुछ ऎसे छुआ,
हलका हलका उंस हुआ
दिल को यह महसूस हुआ

तू ही तू तू ही तू जीने की सारी खुशबू, तू ही तू तू ही तू आरजू आरजू
तेरी जिस्म को आंच को छुते ही मेरी सांस सुलगने लगती हॆ
मुझे इष्क दिलासे देता हॆ मेरे दर्द बिलखने लगते हॆ
छुती हॆ मुझे सरगोशी से, आंखों मे घुली खामोशी से
मॆ फ़र्श पे सजदे करता हूं कुछ होश में कुछ बेहोशी से

तेरी राहों मे उलझा उलझा हूं, तेरी बाहोंमें उलझा उलझा
सुलझाने दे होश मुझे तेरी चाहों मे उलझा हूं

मेरी जीना जुनून मेरा मरना जुनून अब इसके सिवा ना कोई सुकून
मुझे मौत की गोद में सोने दे , मेरी रुह में जिस्म डुबोने दे

कुसुमाग्रज म्हणतात तसे

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात..

कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे,
देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात..
कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे,
कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात..
तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी,
कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात..
नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा,
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात..
उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी,
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात..
हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी,
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात..
ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया,
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात ..

याचा प्रत्यय या सिनेमात वारंवार येतो.

अर्थात शेवटी प्रेमाबद्दल शेवटचा शब्द म्हणजे कुसुमाग्रजांचीच एक कविता...

प्रेमयोग

प्रेम कुणावर करावं ?
कुणावरही करावं

प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं,
भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं,
दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं।
प्रेम कुणावरही करावं।

प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं,
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं,
बासरीतून पाझरणा-यासप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं,
यमुनेचा डोह जहरुन टाकणा-या कालियाच्या फण्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं,
मोराच्या पिसा-यातीलअद् भुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
गोपींच्या मादक लीलांवर करावं,
पेंद्याच्या बोबडया बोलावर करावं,
यशोदेच्या दुधावर,
देवकीच्या आसवांवर,
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं,
ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं

प्रेम
चारी पुरुषार्थांची झिंग देणा-याजीवनाच्या द्रवावर करावं,
आणि पारध्याच्या बाणानं घायाळ हो ऊनअरण्यात एकाकी पडणा-यास्वतःच्या शवावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
कारण
प्रेम आहे
माणसाच्यासंस्कॄतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव ..... !

Tuesday, December 2, 2008

mumbai terrorist attack यावरुन सुचलेले काही (बाही) विचार

अ. IT मधील बंदा - मनोगत

१. गाडी servicing ला द्यायची आहे.
२. CA कडे जायचे आहे.. income tax returns राहिलेच आहेत अजून
३. मुलीच्या शाळेत मीटींग आहे.
४. बायकोला गाण्याच्या क्लासला सोडायचे आहे..
५. मॉल मध्ये जाऊन नवीन कपडे घ्यायला हवेत. उद्या presentation आहे.
६. च्यायला.. रस्ते महानगरपालिकेने किती वाईट बांधलेत. भिकारी मुले किती मध्ये मध्ये येतात.
७. सालं.. india मधे काही life नाही..
८. नवीन मॅक्डोनाल्ड try करायलाच हवं.. मुलीच्या शाळेत सगळे तिला ’इतकंही माहिती नाही का’ म्हणून चिडवतात रे..
९. सवाई गंधर्व ला जायला हवं.. मागच्यावर्षी माझा junior गेला होता ना.. फ़ार भाव खात होता..
१०. चांगला मुंबईला hayat मध्ये meet ला जायचा chance होता.. या अतिरेक्यांनी ’माझ्या’ career ची वाट लावली.
११. christmas च्या सुट्टीत फ़िरायला जावे तर त्या xyz resort मध्ये swimming pool नाही साधा..
१२. हेमंत करकरे गेले त्याची शोकसभा.. अरे वेळ नाही बाबा.. जागतिक मंदी आलीय.. कुठे गुंतवणूक करावी याची मीटींग आहे consultant सोबत.. मी वेळ मिळाला तर e-condolances पाठवितो... वाचून दाखव.

ब. मध्यमवयीन गृहिणी - मनोगत

१. आपल्या घराजवळ मुसलमान वस्ती जरा जास्तच वाढलीय..
२. मिठाईवाला मुसलमान आहे.. त्याच्याकडून sweets घ्यायला नको वाटते.. (काल घेतले सामोसे.. काय करणार.. उन्हाचे कुठे लांब जाणार.. बरं quality चांगली असते मेल्याची !! )
३. गिरणी एक बोहरी बाई चालविते.. तिच्याकडून दळण आणणे नको वाटते.. (जवळपास दुसरी गिरणी नाही.. आपण स्वत: आणले नाही तर तो ज्वारीवर गहू घालतो..)
४. जागतिक शांती वरची पुस्तके.. नको बाई.. मला आपल्या कुसुम अभ्यंकरांच्या कादंब-याच ब-या वाटतात.. छोट्या छोट्या कथांचे कथासंग्रह वाचते ना मी.
५. कालच बाईला शिळे झाले म्हणून चांगले पाव किलो पेढे दिले. या मोलकरणींना कितीही द्या.. कौतुक नाही. त्या जोशांकडचे काम मेली मन लावून करते.. मी इतके सगळे देऊन आपलं काम असं.. नशीबच वाईट..
६. वृध्दाश्रमात नको वाटते बाई.. सारखे त्या म्हाता-या लोकांचे हाल पाहून डोळ्यात पाणी येते.. थांबायला मात्र नको.. कसले कसले रोग असतात त्यांना..
७. हेमंत करकरे.. किती देखणे होते ना.. अकाली गेले अगदी.. त्यांच्या बाहिणीचं पत्र वाचलं का.. डोळ्यात पाणी आलं अगदी.. शोकसभा..असले काही करायला वेळ कुठे आहे ? मधुरांगणचे कार्यक्रम बुडतात..
आणि भिशी असते ना माझी.. साडी आणायला हवी नवीन.. सगळ्या माझ्या साड्या बघितल्या आहेत आता group मध्ये.

क. नोकरी करणारी स्त्री / तरुणी.. - मनोगत

१. terrorist attack मुंबईत झालेत म्हणून एक दिवस सुट्टी द्या असे बॉसला म्हणले तर तो म्हणे मुंबईत attack तुमचा काय संबंध.. या शाल्मलीच्या शाळेपायी कुठे सिनेमा बघणे होत नाही. जरा सुट्टि मिळाली असती तर ’दोस्ताना’ टाकला असता..
२. शाल्मली म्हणत होती तर साधे रव्याचे लाडू करुन देता येऊ नयेत का सासूबाईंना ? तिला सांभाळतात त्याचे कौतुक आहे ना ? आम्ही नोकरी करुन घर सांभाळतो तर सारखे ’घरात फ़ार काम’ असा टिमका चालू असतो. आता वेगळे राहावे म्हणले तरी शाल्मलीचा प्रश्न आहेच.. सहन करणे भाग आहे..
३. ऒफ़िसमधे - सर आज लवकर जाऊ का ?
१. मुलीचा वाढदिवस आहे.
२. xyz डोहाळजेवण आहे.
३. गाडीत पेट्रोल भरायचे आहे.
४. तुळ्शीबागेत जायचे आहे. एरवी वेळ नसतो.
५. ऒफ़िसमधील एक लग्न आहे.. तासभर जाऊन येते.
६. लग्नाचा वाढदिवस काल झाला ना.. काल सुट्टि झाली.. पण आज त्याची पार्टी एक मॆत्रीण मागतेय.. लवकर येते जेवून.. चायनीज मध्येच जाणार आहोत..
४. हेमंत करकरे.. ATS , NSG पेपर बिपर वाचायला वेळ नाही. ते हल्ले पाहून मात्र पोटात तुटले.. ते कमांडोज helicopter मधून कित्ती छान उतरत होते ना.. अभिषेक बच्चन त्या फ़लाण्या सिनेमात अगदी अस्साच उतरतो..
५.विलासराव देशमुख.. एवढं काय झालं रितेशला नेलं म्हणून..ताज पाहायाचा असेल त्याला.. त्याच्या career चा प्रश्न आहेच.
६.शोकसभा.. नको बाई.. घरी दारी सारखं tension नको वाटतं.. त्यापेक्षा ते नवीन mexican food वालं restaurant try करु असं म्हट्लं याला..

ड. पत्रकार - मनोगत

१. मुंबईत स्फ़ोट झाले त्या हॉटेल शेजारी माझं ओफ़िस.. जरा रात्रीच्या duty वर असताना चक्कर मारायला गेलो तर .. रस्ता cross करुन येता येता गोळीबाराचा आवाज.. सुदॆव म्हणून जीव वाचला..
२. हा अनुभव आता सगळ्यांना सांगायला नको.. हा अणि नंतरचा रेल्वे स्टेशन वरचा byte मिळाला त्याचे अनुभव एकत्र करुन एक मस्त story बनवायला हवी.
३. एवढी वर्षं या पत्रकारितेत काढून एक पुस्तक नाही माझं.. आता या अनुभवांवर एखादं पुस्तक छापतो.. त्याचा सिनेमा झाला तर फ़ारच बरं..
४. माझ्या जिवाची काळजी म्हणून एक फ़ोन नाही साधा.. आता मीच सगळ्या मित्रमॆत्रीणींना मेसेज टाकतो.. कोण बरं ती हां.. शिल्पा.. काल zee 24 taas वर होती.. तिला टाकायला पाहिजे मेसेज.. zee वर चान्स मिळाला तर बरे..
५.हेमंत करकरे शोकसभेला जावे लागणार.. .. फ़िल्म फ़ेस्टिव्हलचे coverage आवडले असते पण सध्या हाच विषय hot आहे.. त्या xyz इंग्रजी वृत्तपपत्रात चान्स मिळाला तर बघायचेय.. मराठी पत्रकारितेत राम नाही.

ई. एक प्रोफ़ेसर.. - मनोगत

१. आजकालचे हे तरुण अतिरेकी.. यांना जीवनविषयक मूल्ये वगॆरे काही कळत नाही. धर्म म्हणजे काय हे तरी कळते का यांना? निघालेत धर्माच्या नावाने गोळीबार करत..
२. नाशिकला त्या विद्यापीठात जायचे होते काल.. १० पुस्तके syllabus म्हणून छापली गेली तर घराचा हप्ता भरणे सोपे होईल. या अतिरेकी हल्ल्याने सगळेच डळमळीत झालेय.
३. कॉलेजमध्ये principle सोबत बोलून विद्यार्थ्यांसाठी अतिरेकी आणि दहशतवाद यावर चर्चासत्र आयोजित करायला हवे. मी असे विधायक कार्य करतो त्यामुळे त्यांचा लाडका आहे. इतर प्रोफ़ेसर जळतात माझ्यावर.
४. शोकसभेला जायला नक्कीच आवडले असते.. पण बायको मागे लागलीय.. दोन दिवस गाडी काढून ट्रीपला जाऊयात.. तिचाही संसारात विचार करायला हवा.. मी स्त्रियांना समानतेने वागवतो..

Friday, November 28, 2008

गोष्ट – एका छोट्याशा कोंबडीची !

गोष्ट जुनीच आहे. वळण जरा वेगळे !!)

कोणे एके काळी एक छोटी लाल रंगाची कोंबडी होती. ती एका हिरव्यागार शेतात स्वत:चे धान्य पिकवून पोट भरत होती. एक दिवस तिला गव्हाचा एक दाणा सापडला. तिने विचार केला की ती आता जास्त धान्य पिकवू शकेल.

“मला गहू पेरायला कोण मदत करेल” ? कोंबडीने विचारले ?
“मी नाही.” बदक म्हणाले, “पण मी तुला कॉफ़ीची रोपे आणून देईन. गव्हाऎवजी तू कॉफ़ी लावलीस तर भरपूर पॆसे मिळतील.”

“मी नाही.” डुक्कर म्हणाले. “पण मी तू लावलेली कॉफ़ी विकत घेईन.”

“मी नाही. उंदीर म्हणाला. “पण तुला सुरुवातीला त्यासाठी लागणारे पॆसे मी देईन.”

मग त्या कोंबडीने गव्हाऎवजी कॉफ़ी पेरली.

“ही कॉफ़ीची झाडे वाढवायला मला कोण मदत करेल ?” कोंबडीने विचारले.
“मी नाही”. बदक म्हणाले. “पण मी तुला त्यासाठी लागणारे खत विकत देईन. “
“मी नाही.” डुक्कर म्हणाले. “पण मी तुला पिकावर कीड पडू नये यासाठी लागणारे जंतुनाशक फ़वारे विकत देईन. “
“मी नाही.” उंदीर म्हणाला. “पण तुला खत व जंतुनाशके विकत घेण्यासाठी लागणारे पॆसे कर्जाऊ देईन.”

अशा रीतीने कोंबडीने खूप कष्ट केले. तिने कॉफ़ीच्या शेतात खते घातली. जंतुनाशके फ़वारली. गहू वाढविण्यासाठी लागणा-या पॆशांपेक्षा तिला खरे तर यासाठी खूप जास्त पॆसे लागले. पण कॉफ़ी विकून मिळणा-या पॆशांचा मनात ती विचार करत राहिली. मग कापणीचा हंगाम आला.

“मला कॉफ़ी विकायला कोण मदत करेल ?” कोंबडीने विचारले.
“मी नाही.” बदक म्हणाले. “पण तुला माझ्या कारखान्यात ती भाजायला व पॅक करायला लागेल.”
“मी नाही.” डुक्कर म्हणाले. “आता सगळेचजण कॉफ़ी पेरायला लागलेत आणि कॉफ़ीच्या किंमती धडाधड कोसळल्या आहेत.”
“मी नाही.” उंदीर म्हणाला. “पण तुला आता माझे कर्ज फ़ेडायला हवे.”
अशा रीतीने कोंबडीच्या लक्षात आले की तिने गव्हाऎवजी कॉफ़ी पेरुन मोठी चूक केली आहे. कारण तिच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले होते व खायलाही काही नव्ह्ते.
मला खायला काहीतरी हवे आहे. कोण मदत करेल.?” कोंबडीने विचारले.
“मी नाही.” बदक म्हणाले. “तुझ्याकडे त्याच्या बदल्यात द्यायला काही पॆसे उरले नाहीत.”
“मी नाही.” डुक्कर म्हणाले. “सगळ्यांनी आता कॉफ़ी पेरायला सुरुवात केल्यामुळे खायला कोणाकडेच काही नाही.”
“मी नाही.” उंदीर म्हणाला. “पण मी दिलेल्या पॆशांच्या बदल्यात मी तुझी जमीन विकत घ्यायला तयार आहे आणि कदाचित तुला माझ्यासाठी त्या जमिनीवर काम करायला मी परवानगी देईन.”

Thursday, November 27, 2008

फ़ॅशन..

मधुर भांडारकरचा असल्याने हा सिनेमा पाहाण्याची उत्सुकता होती. पेज ३, चांदनी बार, कॉर्पोरेट मुळे अपेक्षा वाढलेल्या होत्या. त्या वाढत्या अपेक्षांना हा सिनेमा अजिबात पुरा पडत नाही. हम आपके हॆ कौन जर लग्नाची VCD असेल तर ही फ़ॅशन शोज ची VCD आहे. मधून मधून प्रियांका चा सुरेख अभिनय ही जमेची बाजू दिसते. सिनेमा अनेक वेळा (मध्यंतरानंतर तर जास्तच) संथ होतो.

एका बाबतीत मात्र हा सिनेमा मधुर भांडारकर च्या आधीच्या सिनेमांपेक्षा वेगळा आहे. वर उल्लेख केलेल्या सिनेमांचे शेवट नकारात्मक आहेत. कॉर्पोरेट मध्ये एकटी पडलेली बिपाशा बसू, तर पेज ३ मधली कोंकणा. चांदनी बारमध्येही बारबालांचे दु:ख, एकटेपणा इथेच सिनेमा संपतो.

फ़ॅशनमध्ये प्रियांका एका आवर्तनात गरगरत व्यसनांच्या अतिरेकात अडकते.. असे एका टप्प्यावर घडले तरी तिच्या आईवडिलांच्या साहाय्याने ती परत एकदा त्याच industry मध्ये उभी राहाते. सिनेमाचा शेवट तद्दन फ़िल्मी असला तरी तो - आयुष्यात घडलेल्या चुकांची भरपाई नीट पाय रोवून उभे राहता येऊन करता येते याची नीट जाणीव करुन देतो. त्यासाठी आत्महत्या, निराशा, मानसिक विकृती अशा शिक्षा भोगाव्याच लागतात असे अनेकदा मांडले जाते. पण खंबीर प्रयत्नांनी तुम्ही हे सगळे avoid करुन स्वत: आयुष्यात पुढे जाऊ शकता व सोबत इतरांनाही नेऊ शकता (सिनेमात कंगणा राणावत हिला प्रियांका मदत करते असे दाखविले आहे.) हा महत्वाचा मुद्दा या सिनेमात मांडला आहे.

Tuesday, November 25, 2008

रुक्मिणी

बाई, काय पाहिलंस, कसं साहिलंस नाही विचारत
वंचनेचा चेहरा दिसतो कधी अगदी करूण आणि भोळा
पण हे उमगण्याचं सहावं इंद्रिय असतंच ना प्रत्येक शहाण्या बाईला

म्हणून विचारायचं ते नंतरच्या उलाथापालथीबद्दल
तुझ्या फ़रपटीबद्दल
सोन्याच्या दिवसांनी उचललेला मेणा तुझा
तू कशी आलीस चालत द्वारकेहून इतक्या लांब पंढरपुरात ?
कशी राहिलीस परक्या मुलुखात, भयाण अनोळखी दिंडीरवनात ?
जगण्याची ठेच अशी खाल्लीस की पावलाला रक्ताची धार लागली
अन तुझी ती हिंमत त्याने रुसवा म्हणून निकालात काढली
पुन्हा तुझ्या शेजारीच वस्ती केली त्यानं नव्यानं
तरी परतली नाहीस मुकाट त्याच्याकडे
एकटीच चूल मांडून ताठ मानेनं जगत राहिलीस
कानठळ्या बसविणारा टाळमॄदंगाचा गजर शेजारी
तो ऎकत उभा जन्म उपेक्षेनं काढणं काय असेल?
पाय दगडाचे केलेस अन ओठही दगडाचे
बाई, तुझ्या कोनाड्यात आकांताचा पोत भडकलाच नसेल?
झाकलं नाहीस तरी उघडलंही नाहीस चव्हाट्यावर
संसाराचं श्रीफ़ळ तुझ्या ओटीतून अलगद काढून घेतलं त्यानं
पण तू दळत राहिलीस तुझ्या दु:खाचा बुक्का शांतपणे
पंढरी काळीनिळी झाली त्याच्या उधळ्यानं..

अरुणा ढेरे

पट्टराणी..

रुक्मिणी

पदराबरोबर प्रपंचाची प्रतिष्ठा खोचून
पट्टराणी तू वावरलीस त्याच्या राजघरात
ठेवलं नाहीस बांधून त्या राधेच्या रमणाला
भामेच्या वल्लभाला, कॄष्णेच्या केशवाला,
तुझ्या असतेपणाच्या तलम भरजरी वेढ्यात

तो पालांडून गेला असेल जेव्हा युगाच्या अवकाशातलं
वर्तमान आणि भविष्याचं विराटपण सहजपणे
तेव्हा राजवाड्याच्या भुलभुलॆय्यातली लहान लहान अंतरं
चकवे आणि तळघरं तू पार करत असशील निर्धाराने

कालयवन, जरासंध, शिशुपाल, कौरव.. दुष्टशक्तींच्या विनाशात
तो महानायक गुंतला असेल
तेव्हा तू असशील मुलाला पाजवत, निजवत, गोष्टी सांगत
बापाच्या दूर असण्यानं तो दुखावू नये म्हणून काळजी घेत
उद्याचा यदुनायक वाढवत असशील

तुझं आईपण अवघड आणि बाईपण त्याहूनही अवघड
तरी कशी सोपंच करत गेलीस तू त्याला
तुझ्या आयुष्यातून निसटून जगडव्याळ पसरत जाणं ?
कसं समजलं तुला हे अवघडातलं सोपेपण
म्हणजे स्वाभाविक जगण्यासाठी दुस-याला मोकळं करणं ?
आणि म्हणजेच संपूर्ण प्रेम करणं

अरूणा ढेरे

कॅलिडोस्कोप

रोज सकाळी ऒफ़िसला जाताना गाडी सुरू केल्यापासून ऒफ़िसमध्ये पोहोचायचा वेळ साधारणत: २५ मिनिटे. त्या पंचवीस मिनिटात निवांतपणा मिळतो आणि मनात विचारांची गर्दी होते. त्यात मनात साठणारी दॄश्ये कॅलिडोस्कोपसारखी उमटतात. लोलक फ़िरतो आणि अचानक वेगळे दॄश्य दिसते.

गेल्या आठ दिवसात कोकिळेचा आवाज ऎकू येतो. मोग-याचा वास.. कलिंगडाच्या फ़ोडी.. आंब्याची अढी.. परीक्षांच्या दिवसातील जागरणे.. रमणबागेच्या पटांगणावर बाबूजींचे रामनवमीला ऎकायला मिळणारे गीतरामायण. सारे काही क्षणार्धात जागे करण्याची किमया त्या कोकिळेच्या सुरात आहे.

जरा पुढे गेले की जे कोणते गाणे गाडीत कानावर पडते, त्या गाण्याने मन कोणत्यातरी प्रसंगात जाते. श्रीधर फ़डके यांचे ’काही बोलायाचे आहे’ हे त्यांच्या चतु:शृंगी येथील कार्यक्रमात तर ’तुला पाहिले मी’ यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ते गाणे प्रथम ऎकले त्याच्या आठवणीत नेते.

कुमार गंधर्व, पं.जसराज थेट सवाई गंधर्व संगीत महोत्सवात नेतात. एकदा पहाटेच्या सुमारास जसराज गायला बसले आणि झाकीर हुसेन यांचे आधी सोलो तबलावादन झाले होते तरी ते जसराज यांच्या साथीला अचानक आले.. ते स्टेजवर आल्यावर झालेला आनंद आणि टाळ्यांचा कडकडाट आजही मनात तसाच आहे.

रोजचा तो पंचवीस मिनिटांचा प्रवास नवीन काहीतरी शिकवून जातो. परवाच एका माणसाचा सायकलवरुन तोल गेला व त्याचा डबा पडला व सांड्ला.. तो गोळा करण्याचा त्याचा प्रयत्न चालला होता. मनात कालवाकालव झाली.

हे सगळे शब्दबध्द करण्यापलीकडे आपण काही करत नाही. मुर्दाड आहोत याची जाणीव होईपर्यंत ऒफ़िस येते आणि दिवसभराची कामे सगळे विचार मनाबाहेर घालवितात.

अनय

नक्षत्रांच्या गावातून उतरली होतीस तू त्याच्या घरात
मेघश्याम आभाळाची ओढ तुझ्या रक्तातच होती
हे समजलं होतं त्याला, अगदी पहिल्यापासून।
तुझ्या बाईपणाची जात विजेची, शेजेला घेता न येणारी
ओळखून होता तो आतून, आतून, खोल मनातून…।

तुझ्या झिळमिळ स्वप्नांच्या मोरपिसांना
त्याने कधी देऊ पाहिले नाहीत आपले डोळे,
आणि नाही गढूळ केले कधी तुझ्या देहात हिनकळणारे
धुंदमदिर निळे तळे…

त्याच्या मृण्मय आयुष्यात उमटली होती
अमराचा अळता लावलेली तुझी पावले।
घरात तुझ्या असण्याचा अविनाशी गंध होता;
काठोकाठ भरून होता तो नुसत्या तुझ्या आसपास वावरण्याने;
तुझ्याशी खोलवर कृतज्ञ होता…।

पाहिलं त्यानं तुला उंच बेभान उसळताना;
रात्रीच्या रसज्ञ काळ्या अंधारात मिसळताना;
मधुर विषाचे घोट खुळ्या ओठांनी आकंठ घेताना;
पिसावताना, रसावताना,
अस्तित्वाचा कण न्‌ कण
प्रेमाच्या चेहऱ्यावर उत्कट उधळून देताना…

कळली त्याला तहान तुझ्या तृप्तीला लागलेली अतृप्तीची;
दु:खाचं नख लागलेल्या काळजाची तडफड कळली शर्थीची;
कळली कशी असते प्रेमात स्त्री भरतीची आणि सरतीची

तू हरलीस हे त्याला कळलं, पण निरर्थाच्या वाटेवर
हरवली नाहीस, स्वत्व सांभाळून उरलीस तशीच, हेही कळलं.
त्यानं पुढे होऊन तुझ्या पापणीवरचा शोक टिपला,
त्या क्षणी, राधे तुला तुझा पुरुष भेटला
पुरुष-जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो।
राधे, पुरुष असाही असतो! …………।

अरूणा ढेरे..

रस्ता...

रस्ता

उस मोडपे बॆठा हूं
जिस मोडसे जाती हॆ
हर इक तरफ़ राहें..
इक रोज तो युं होगा
इस मोडपे आकर तुम
रुक जाओगी कह दोगी
वह कौनसा रस्ता हॆ
जिस राह पे जाना हॆ…

एक उदास सकाळ.. ढगाळलेले वातावरण..कुंद हवा.. नुसतीच तगमग. लग्नाला जायचे होते. जवळचे लग्न.. पण मूड्च येईना.. शेवटी मनापुढे हार पत्करुन लग्न – साडी – दागिने cancel करुन जीन्स – जॅकेट असा सरंजाम करुन बाहेर पडले. कुठे जायचे काही ठरविलेले नव्हतेच. एका मित्राला फ़ोन केला. माझा स्वर ऎकून तो नुसताच ’ये’ इतकेच म्हणाला. त्याच्या घरी आजपर्यंत गेले नव्हते. मग रस्ता शोधत गेले. त्याने हवेला सूट होणारी कॉफ़ी तयारच ठेवली होती. निवांत बसले.. ऒफ़िसला चक्क दांडी.. किती दिवस .. वर्षे झाली बरे.. अशी निरुद्देश दांडी मारुन. तेही आठवेना इतकी. मोबाईलही बंद केला. मनात एका परिचितांचा dialogue आठवला. हळू हळू tourist spots वर mobile jammer लावलेत म्हणून जास्त charge घेतील लोक.

कॉफ़ी, सहज इकडच्या तिकडच्या गप्पा.. थोडे खाणे .. आणि मनातला सल एकदम निघून गेला. सगळीकडे छापून येत होते तेच तिचेही दुखणे होते.. वेग थोडा कमी करा.. गाडी चालविण्याचा, टीव्हीची चॅनेल्स बदलण्याचा, आणि जगण्याचाही..

बाहेर पडले.. आणि एका नवीनच झालेल्या रस्त्याने गाडी काढली.. वा.. आता तेच आकाशातले ढग एकदम रोमॅंटिक वाटायला लागले.. मनात ’काली घटा छाये’ सारखी गाणी सुचायला लागली. घरी नवीन काय पदार्थ करायचा ते सुचले.. ऒफ़िसमधले ताण कमी करायचे plans सुचले.

किती सोपे होते सगळे.. फ़क्त स्वत:ला थोडा वेळ द्यायला हवा होता.

त्या नवीन रस्त्यावरुन आता जेव्हा कधी जाते तेव्हा हीच आठवण येते आणि तो रस्ताच मग लाडका झाला आहे.

Thursday, August 21, 2008

अनुभव..

अनेक दिवसांनी trekking ला जायचा योग आला. गडाच्या पायथ्याशी एका ओळखीच्या मुलीचे घर होते. तिच्याकडे रात्री मुक्काम केला. मुलगी अतिशय कष्टाळू.. गावात घर.. पुण्यात राहून शिकणारी. गावातले घर डोंगराच्या पायथ्याशी.. घरात एकूण माणसे सात..

आजी.. शहरात एखादया दिवशी वीज नसेल तर गॅसवर पाणी तापविण्यासाठई एखादे जड पातेले उचलताना मला त्रास होतो. आजीबाई भराभर चार पाच पातेली चुलीवर चढवत – उतरवत होत्या.

आई.. सर्व मुलींवर सारखीच माया.. आणि अंगात ताप असताना व आम्ही आमचे डबे सोबत नेलेले असताना.. भात, भाजी, पापड, पोळ्या असा एकूण २० माणसांचा स्वयंपाक चूल व स्टोव्ह वापरुन केला. शहरात चार पाहुणे येणार असतील तर काय मेनू करायचा हे चार दिवस ठरत असते आपले..

(सारेगमप या झी मराठी वरील कार्यक्रमात अवधूत गुप्तेने एक जोक केला.. एका मुलीने ’कोण येणार गं पाहुणे’ हे गाणे गायल्यावर अवधूत पल्लवीला म्हणाला.. हे गाणे म्हणणा-या व्यक्तीचे शहर कोणते..

१. पुणे
२. मुंबई
३. कोल्हापूर.

पल्लवीला उत्तर सुचेना.. यावर अवधूत म्हणाला.. पुणे नक्की नाही.. पाहुणे येणार याचा इतका आनंद पुणेकरांना होणे शक्य नाही… )

तर.. घराभोवती शेती.. फ़ुलझाडे, भाज्या.. माझ्या घराभोवती असलेल्या चिमुकल्या बागेत काम करणे मला शक्य होत नाही आणि इकडे प्रपंच, म्हॆस .. पाहुणेरावळे, गावातील एक दुकान सांभाळून ती माऊली शेत पाहात होती.

ज्या मुलीकडे राहिलो ती आरामात डोक्यावर दोन हंडे घेऊन पाणी घेऊन आली.. (लांबून पाणी आणायला लागले तरी ’आम्ही आंघोळी करून गड चढायला का जात नाही अशी आजीबाईंची कुरकुर चालूच होती)..

स्वत:ची लाज वाटावी असे हे अनुभव.

Saturday, July 12, 2008

श्रीधर फ़डके यांच्या गाण्यातील पाऊस.. २

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा
भिजूनी उन्हे चमचमती,
क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण,
प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन,
भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू,
मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा

गीत : शांता शेळके
संगीत : श्रीधर फ़डके
गायिका : आशा भोसले
अल्बम : ऋतू हिरवा

. ’ऋतू हिरवा’ ही कॅसेट आली तेव्हा एक लक्षात आले, ज्या ज्या मराठी घरात शेल्फ़मध्ये वरती सुधीर फ़डके यांचे गीतरामायण असते. तेथे शेजारी श्रीधर फ़डके यांच्या ऋतू हिरवा आवर्जून विराजमान झालेला असतो.प्रचंड गाजलेला हा अल्बम.. आशा भोसले यांनी या गाण्यांचे सोने केलेले आहे.

२. ’ऋतू हिरवा’ हे कायम हिरवेगार असणारे एक पावसाचे गाणे आहे. शांता शेळके यांचे शब्द अतिशय चपखल.. तोच चंद्रमा नभात, रेशमाच्या रेघांनी पासून अनेक गाणी त्यांनी दिली आहेत. या गाण्यात ’नितळ निळ्या अवकाशी, मदनाचे चाप जणू’.. हे शब्द किती सुरेख गायले गेले आहेत. सुधीर फ़डके यांच्या गायनाचे वॆशिष्ट्य म्हणून ’त्यांचे शब्द गाण्यात भाव घेऊनच उतरायचे’ असे नेहमी सांगितले जाते. तोच वारसा ऋतू हिरवा व श्रीधरजींच्या इतर अल्बममध्ये स्पष्ट जाणवितो. गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा .. ही कल्पना किती सुंदर आहे. एका कवितेत ’माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाशशृतींनी जरा कानोसा देऊन कधी ऎकशील का रे.. अशी विनवणी . आणि पहिल्या पावसानंतर आकाश व धरतीचे मिलन दाखविणारे वरचे गाणे .. शब्दांचे सामर्थ्य दाखविणा-या दोन्ही कविता..

३. तर पाऊस..

आपण असतो
कुणी कुणाकुणाचे.
तसा पाऊसही....

पाऊस कधी जिवलग
कधी सखा कधी स्नेही
कधी दूरचा
कधी अगदी आतला अनाम....
नात्यातला.

कधी तोच असतो अनावर आवेग
कधी तोच असतो अचेतनाचा रंग
आणि अनेकदा
विशुद्ध पाऊसदेखील....

जगजीतने गायलेल्या एका गझल मध्ये हा पाऊस
बरसात का बादल तो आवारा हॆ क्या जाने
किस छतको भिगोना हॆ किस राहसे बचना हॆ.. असे आवारापन घेऊन येतो.

४. भिजूनी उन्हे चमचमती.. याचा प्रत्यय नुकताच कोकणात केलेल्या प्रवासात आला. कानाला लावलेल्या आयपॉडवर ’ऋतू हिरवा’ वाजत होतं.. बाहेर रिमझिम पाऊस… क्षण दिपती.. क्षण लपती.. याचा परत एकदा प्रत्यय आला.

५. थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा .. हाच आशय मांडणारी अजून एक कविता..

असे मृगाचे दिवस
धुंद कोसळे पाऊस
गर्द पोपटी रानात सखे हरवून गेले

वेळ जांभळी जांभळी
उन्हे चाफ़्यात लपली
रंग माखून हसले डोळा सांजस्वप्न झेले

झिरमिळती पालवी
वेल उसासली नवी
मॆनेसवे राघू बाई काही भलतेच बोले..

६. गाण्यातून सुध्दा भिजवी तन, भिजवी मन हा प्रत्यय देणारे गाणे. कितीही वेळा ऎकले तरी ते ’हिरवेगार’ सतेज, टवटवीत आहे.. श्रीधर फ़डके यांचे कविता निवडण्याचे, त्याला योग्य त्या चाली बांधण्याचे वेगळेपण, विलक्षण तन्मयता या त्यांच्या सुरूवातीच्या अल्बमपासून दिसते.

Friday, June 27, 2008

श्रीधर फ़डके यांच्या गाण्यातील पाऊस.. १

रोज तुझ्या डोळ्यात नव्याने रिमझिमणारा श्रावण मी
आठवणींच्या गंधफ़ुलांनी दरवळणारा श्रावण मी
आकाश पावसाचे ते रंग श्रावणाचे..
ओथंबल्या क्षणांचे
हिरवळलेल्या वाटेवरती एकटीच फ़िरताना
पाऊसओल्या गवतावरचे थेंब टपोरे टिपताना
तुझ्या मनाच्या हिरव्या रानी भिरभिरणारा श्रावण मी..
रंगली फ़ुगडी बाई रानात रानात
वाजती पॆंजण बाई तालात तालात
फ़ांदीवरला झोका उंच उंच गं झुलताना
हात तुझा मेंदीचा हळूच पुढे तू करताना
तुझ्या गुलाबी ओठांवरती थरथरणारा श्रावण मी..
पावसातले दिवस अपुले शोधतेस आज जिथे
तुझे नि माझे गीत कालचे ऎकतेस आज जिथे
तिथेच कोठेतरी अजूनही मोहरणारा श्रावण मी
अजूनीच त्या ठिकाणी ती श्रावणओली गाणी
माझी तुझी कहाणी..

गीत: अनिल कांबळे
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : सुरेश वाडकर
अल्बम : तेजोमय नादब्रम्ह

१. अनिल कांबळे व श्रीधरजी यांचे गाजलेले गाणे म्हणजे ‘त्या कोवळ्या फ़ुलांचा बाजार पाहिला मी’..

२. हे वरचे गाणे म्हणजे रोमॅंटिक या सदरातले.. हुरहुर लावणारे.. ती त्याच्या आयुष्यात आता नाही. त्याच्या संसारात तो सुखी असावा.. तीही आहे तिथे सुखात असावी.. पण श्रावणातल्या थेंबांसोबत आठवणी मनाला बिलगतात..
मोरपिसांचा पाऊस यावा
निळसर हिरव्या हळव्या रात्री
स्पर्शलिपीतून लिहिले जावे
हस्तीदंती रेखीव गात्री

त्या अवस्थेत कॉलेजमध्ये असतानाच्या श्रावणातल्या आठवणी आल्या आणि हे गीत बनले. हे दोन वेगळ्या कवितांचे मिळून एक केले आहे. (असावे !).. कारण ‘श्रावण मी’ हे यमक जुळणारी एक कविता आहे व मधल्या काही ओळी दुस-या कवितेतील असाव्यात.. असा प्रयोग श्रीधरजींनी ‘हे गगना’ मध्ये तीन कविता एकत्र करून ‘क्षितीजी आले भरते गं’ मध्ये केला आहे.

३. एकाच श्वासात पहिली व दुसरी ओळ म्हणणे यात अपेक्षित आहे असे मध्यंतरी झालेल्या एका कार्यक्रमात स्वत: श्रीधर फ़डके यांनीच सांगितले.’रंगली फ़ुगडी बाई’ आणि ‘वाजती पॆंजणे तालात’ मध्ये ‘फ़ुगडी’ घालणा-या मुली साक्षात डोळ्यासमोर येतात.. रिमझिम हा शब्द मध्ये या गाण्यात आठ वेळा म्हणला गेला आहे. तो रिमझिम पाऊस भोवताली पडतो आहे असे नीट्पणे ऎकले तर वाटेल.४. सुरेश वाडकर व सहका-यांनी हे गाणे सुरेख गायले आहे. दरवळणारा, थरथरणारा, भिरभिरणारा, मोहरणारा श्रावण साक्षात मनात उभा राहतो. ‘गुलाबी ओठ’ हे शब्द किती गुलाबी मुलायमपणे म्हणले गेलेत ते ऎकूनच कळेल.. ‘ये आंखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते हॆ’ या गाण्यातला सुरेश वाडकर यांचा आवाज आठवतो.

५. गच्च भिजलेले रान, थेंबाथेंबात दाटलेला पाऊस, हिरव्या मखमली वाटा.. एकटाच आठवणी मनात घेऊन फ़िरणारा तो.. असे शब्दचित्र शब्द, सूर व गीत यांच्या माध्यमातून सहज उभे राहाते..

६. तिनेही जर हे गीत ऎकले तर ..
देह झाला कस्तुरीचा केवडाही घमघमे
इथे तिथे ठायीठायी गंधभारला पाऊस..

अशीच तिची अवस्था होईल..

आकाशात फ़ुललेली
मातीतील एक कहाणी
जो प्रवास सुंदर होता
आधार मातीला धरती
तेजोमय नक्षत्रांचे
आकाश माथ्यावरती
सुख आम्रासवे मोहरले
भोवताल सुगंधी झाले
शून्यामधली यात्रा
वा-यातील एक विराणी
गगनात विसर्जित होता
डोळ्यात कशाला पाणी..

कुसुमाग्रज

याच कवितेतील भाव ‘रोज तुझ्या’ मधे आहे. ती श्रावणओली कहाणी ऎकून मनातल्या सुप्त तारा झंकारतात. सुखद आठवणींचे सूर उमटून एक हलकेसे स्मित ओठांवर येते..

‘मेरे दुश्मन तू मेरी दोस्तीको तरसे’ वगॆरे गाण्यांमधला शाप या गाण्याला नाही. ‘हॆ दुनिया उसीकी जमाना उसीका मुहोब्ब्त में जो हो गया हो किसीका’.. असे शांतपणे स्वीकारणा-या वृत्तीचे हे गाणे आहे..

Wednesday, March 26, 2008

फ़िटे अंधाराचे जाळे

फ़िटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखो-यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश !
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे
जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास..

दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास..

झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास..

सा-या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास... .

सुधीर मोघे

या गाण्याबद्दल मनात लिहावेसे खूप वाटत असूनही लिहिले नाही कारण श्रीधरजींची श्रवणीय परंतु रसिकांपर्यंत न पोहोचलेली गाणी निवडून त्याबद्दल लिहावे अशी इच्छा होती... कोणत्याही कार्यक्रमात फ़र्माईश होतेच ते हे गाणे.. या गाण्याबद्दल सर्वपरिचित गोष्टी म्हणजे..
१. हे लक्ष्मीची पाऊले या मराठी चित्रपटातील गाणे आहे.
२. हे सुधीर फ़डके व आशा भ्रोसले यांनी (अप्रतिम) गायले आहे.
३. मुलाच्या संगीतदिग्दर्शनाखाली वडिलांनी गायलेले गीत हे याचे अजून एक वॆशिष्ट्य..
४. यातील शेवटचे कड्वे चित्रपटातील प्रसंगाला अनुरुप नसल्याने ते द्वंद्वगीतात वगळले आहे...

गाणे म्हणून हे किती 'जमले' आहे.. ते त्याच्या लोकप्रियतेमुळे जाहीरच आहे.. पण गाणे झाले नसते तरी मूळ कविता अतिशय सकारात्मक दृष्टीकोन मांडणारी आहे.

अगदी वॆयक्तिक अशी एक आठवण माझ्यापाशी या गाण्याची आहे.. ..मनावर काजळी धरलेले काही अतिशय उद्विग्न क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात.. तसे ते माझ्याही आयुष्यात असतानाच्या काळात मी सिध्द समाधी योगाचा कोर्स केला. तो कोर्स करताना शेवट्चे चार दिवस आम्ही शांतिवन येथे गेलो होतो. मनात येईल ते गाणे म्हणा असे ठरले. खरे तर वेळ संध्याकाळची होती.. 'सांज ये गोकुळी' सारखे गाणे जास्त शोभले असते.. पण त्या वातावरणामुळे मनातला काळोख दूर झाला होता.. आणि माझ्या मनात हेच शब्द आले..
झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास

'फ़िटे अंधाराचे जाळे' या अल्बममध्ये हे स्वत: श्रीधरजींनी गायले आहे.. 'एक अनोखे लावण्य'.. किंवा 'सोनसळी अभिषेक' या शब्दातील 'चित्र' संगीत व सूर यांच्या साहाय्याने जिवंत झाले आहे..

सा-या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास..
हे चित्रपटात नसलेले शब्द.. Our sweetest songs are those that tell of saddest thought. Percy Bysshe Shelley.. किंवा हवेहवेसे दु:ख तुला जर हवेच आहे नकोनकोसे हळवे कातर बोलू काही.. या दोन्हीतले ते 'हवेहवेसे दु:ख' या श्रीधरजींनी गायलेल्या गाण्यात उतरले आहे.. 'रंग किरमिजी' .. 'अवेळीच केव्हा दाटला अंधार' .. या गाण्यांमधून असेच दु:ख झिरपते.. दु:खी दर्दभरी .. हळवी गाणी संवेदनाशील मनांना एक वेगळा आनंद देऊन जातात.. असे स्वर आहेत तलत मेहमूद किंवा मेहंदी ह्सन यांचे..

'मन मनास उमगत नाही' ने एक अस्वस्थता निर्माण होते.. तर 'फ़िटे अंधाराचे जाळे' या गाण्याने जगण्याची नवीन उर्मी प्राप्त होते..

सुधीर मोघे.. सुधीर फ़ड्के.. आशा भोसले व श्रीध्रर फ़ड्के यांनी हे गाणे अजरामर केले आहे

दिवे देहात स्पर्शाचे


दिवे देहात स्पर्शाचे जळाया लागले होते
तुझ्या बाहूत मी जेव्हा ढळाया लागले होते

ऋतू एकेक स्वप्नांचे फ़ुलाया लागले होते
तुझ्याशी रेशमी नाते जुळाया लागले होते

तुला मी सांगण्या आधी
मला तू सांगण्याआधी
मनातील एकमेकांना कळाया लागले होते

तुझ्यामाझ्यातील जेव्हा
गळाली बंधने सारी
सुखाचे शहर चंदेरी दिसाया लागले होते

दंवाने चिंब झालेल्या कळीचे फ़ूल होताना
पहाटे स्वप्नरंगांनी दिशा उजळून येताना
मला आकाश पूर्वीचे मिळाया लागले होते

गीत : अनिल कांबळे
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : श्रीधर फ़डके / अनुराधा पॊडवाल
अल्बम : अबोलीचे बोल

अगदी एक सहज वाटणारं प्रेमगीत.. युगुलगीत.. असं या गाण्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं.. पण एके रात्री निवांतपणे गाडी चालवत असताना गाणं जरा जास्त लक्षपूर्वक ऎकलं. आणि त्यातील 'सुखाचे शहर चंदेरी' मला दिसले.

तुला मी सांगण्या आधी
मला तू सांगण्याआधी
मनातील एकमेकांना कळाया लागले होते

याचा अनुभव प्रेमात पडल्यावर येतो... पण

तुझ्यामाझ्यातील जेव्हा
गळाली बंधने सारी
सुखाचे शहर चंदेरी दिसाया लागले होते..

ही बंधने किती आणि कोणती 'गळाली' हे ज्याचे त्याने ठरवावे.. ती गळाली आहेत हा अनुभव फ़ार फ़ार वॆयक्तिक असतो. आणि ती जाणीव फ़ार सुखद असते. कारण

प्रीतीची वाट नेहमीच जात असते अथांग जळातून
वाळूवरच्या पावलांनी तिचा माग लागत नसतो..

पण एकेक पापुद्रा निघत जातो.. तसतसे त्या रेशमी नात्यातील पदर उलगडत जातात.. यात 'मी' पणाचेही बंधन कधीतरी गळून पडते.....

जवळपणात होतो दूर आता दुरून झालो जवळ
म्हणू नकोस जाणूनबुजून मीच माया केली पातळ

तशी आठवण येत नाही भेटीचीही काय जरूर ?
सूर वाहे ऊर भरुन घरांत देखील चांदणे टिपूर

इतके दिवस हसत रुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळते खोल खोल माझ्याच दॄष्टीत मिटली आहेस

गंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत

कधी कामात कधी गाण्यात फ़ुलताफ़ळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर तुझ्यात असतो

आता तारे पिकत चालले आकाश झाले निरभ्र निवळ
दुरुन जवळ झालो तसे क्षितिजदेखील आले जवळ...

बा.भ.बोरकर

'तुला विसरुन अष्टौप्रहर तुझ्यात असतो'.. यात सगळी बंधने गळाली आहेत असे लक्षात येते.

दंवाने चिंब झालेल्या कळीचे फ़ूल होताना
पहाटे स्वप्नरंगांनी दिशा उजळून येताना
मला आकाश पूर्वीचे मिळाया लागले होते

प्रेमात पडल्यावर परत एकदा आयुष्यातले सोनेरी दिवस जागे होतात..

आकाश पाणी तारे वारे सारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला
आवेगांचे तुरे फ़ुटतात..

याचा प्रत्यय येतो..

पाऊस या विषयाप्रमाणेच प्रेम या विषयावर कविता न लिहिलेला कवी सापडणे दुर्मिळ..

'ऋतू एकेक स्वप्नांचे'.. खरोखर फ़ुलाया लागले आहेत असे वाटावे असे ते शब्दोच्चार येतात.. श्रीधरजींची युगुलगीते फ़ारशी नाहीत. पण या कवितेशी. गाण्याशी मनाचे नाते या गीतातून नक्कीच जोडले जाते..

Tuesday, March 25, 2008

सल..

सल..

संध्याकाळची हुरहुर लावणारी वेळ.. रिकामपण असेल तर मनात अशा वेळी हमखास कातर आठवणी जाग्या होतात. शांता शेळके यांच्या

कोमल हळवी उदास झाली मावळतीची किरणे
आतआतूनी दाटुन आली विस्मृत काही स्मरणे..

या ओळी आठवल्या. आज तर अचानक मोबाईलवर एक मेसेज आला होता. त्या मेसेज पाठविणा-या व्यक्तिचे नाव पाहून ती अजूनच हळवी झाली.. मन थेट दहा वर्ष मागे गेले..

डोळ्यात आनंदाची फ़ुलपाखरे घेऊन ती अल्लडपणे नाचतच घरी आली. शनिवार रविवार शाळेला सुट्टी .. थोडा गृहपाठ संपवला की टीव्ही बघायला, लायब्ररीतील पुस्तक वाचायला ती मोकळी होणार होती.. आल्या आल्या आई रागावली.. “अगं गधडे.. आता तू लहान आहेस का? नववीत गेलीस तरी नाचानाच थांबत नाही तुझी..!”

ती काहीच बोलली नाही. तितक्यात टेबलाजवळ खुर्ची ओढून मटारचे दाणे सोलणारा इंद्रनील तिला दिसला. इंदरदादा आला की नेहमीच त्याच्या आत्याला म्हणजे तिच्या आईला मदत करायचा. आई त्याच्याशी माहेरचा माणूस म्हणून गप्पा मारण्यात रमून जायची. तो लहान असल्यापासून मोठ्या भावाचा मुलगा.. असे ममत्वाचे, जिव्हाळ्याचे नाते आईचे त्याच्याशी जडलेले तिला जाणवायचे.

आत्तादेखील आता नेहमीप्रमाणे मटारची उसळ न करता ’सामोसे’ करायची स्पेशल फ़र्माईश इंद्राने आत्याला केलीच होती. आणि सामोसे हवे असतील तर मुकाट्याने मटार सोलायचा त्याला हुकूम मिळाला होता.

झाले..आईला आता दोन दिवस तिच्याकडे लक्ष द्यायला फ़ार वेळ मिळणार नव्हता.. बाबा शनिवार रविवारी फ़क्त यायचे.. त्यांनाही या रविवारी यायला जमणार नव्हते.. तिच्या भावविश्वातील कार्यक्रमांना काहीही अडथळा नव्हता. आता पटापट अभ्यास संपवून मस्तपॆकी आवडती गाणी ऎकत.. कांदबरी घेऊन स्वत:च्या कोशात शिरणे फ़ार सोपे झाले होते..

सोपस्कार म्हणून जेवणाच्या टेबलावर ती आई व इंदरदादाबरोबर जेवायला बसली. नेहमी ती त्यांच्या ’नातेवाईकांच्या’ गप्पात नसेच. पण अचानक रेडिओवर ’चुपके चुपके’ ऎकू आली.. आणि दादा म्हणाला.. “अरे वा.. हा तर गुलाम अली”.. ती तिला नव्यानेच प्राप्त झालेले ज्ञान प्रकट करत म्हणाली ’हे तर निकाह या सिनेमातील गाणे आहे. मला फ़ार आवडते’. मग इंदरदादाने तिला गुलाम अली हा कसा एक गजल गायक आहे.. ही त्याची लोकप्रिय गजल आहे.. म्हणून सिनेमात घेतली आहे.. इ.इ. तपशील पुरवले.. तसेच त्या रेकॉर्डमधे नसलेले दोन शेर अर्थांसहित उलगडून दाखविले..

जेवणाच्या टेबलावर मग स्वत:ला नव्याने आवडायला लागलेला एक क्रिकेटवीर..त्याचे पोस्टर.. नव्याने प्रदर्शित झालेला एक ’लव्हस्टोरी’ असलेला सिनेमा. त्यातला नवोदित हिरो.. आवडत्या कविता.. पुस्तके.. मनाला अचानक आवडायला लागलेल्या आर्ट फ़िल्मस.. हे सगळे इंदरदादाशी किती बोलू अन किती नको असे तिला होऊन गेले.. त्या सगळ्यातली त्याला किती माहिती आहे हे जाणवून ती स्तिमितच झाली.

दोन दिवस स्वत:च्या विश्वात घालविण्याचा निर्धार कुठल्या कुठे पळून गेला. आणि इंदर पण त्याच्या मावशीकडे जायचा होता तो न जाता त्यांच्याकडेच थांबला. रात्री पण ब-याचवेळ त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मग रात्री बारा वाजता कॉफ़ीचा एक राऊंड झाला… परत गप्पा.. पहाटे कधीतरी ती भारावलेल्या मनाने झोपी गेली.

रविवारची सकाळ एकदम सुंदर उजाडली. बागेतील जुईच्या फ़ुलांचा गजरा आपल्या लांबसडक वेणीवर माळून व नव्यानेच शिवलेला एक चुडीदार घालून ती तयार झाली. दादाच्या एका हॉस्टेलवर रहाणा-या मॆत्रिणीला भेटायचे ठरले होते. मग काय .. तिला हॉस्टेलपर्यंतचा रस्ता चांदण्यांच्या पायवाटेसारखा भासला. त्याच्या मॆत्रिणीला भेटणे, हॉटेलमध्ये जाणे, दादाने स्वत:च्या मॆत्रिणीला हिची ’हुशार आहे हं अगदी’ अशी करून दिलेली ओळख.. सगळे काही तिला सुगंधी, हळव्या स्वप्नांसारखे भासत होते.

दोन दिवस आलेला इंदर तिच्या आयुष्यात एक अनोखे दालन उघडून त्याच्या नोकरीच्या गावी निघून गेला. मग तिला काही दिवस एकदम सुने सुने वाटले. मॆत्रिणींना त्याच्याबद्दल सांगून झाले होते.

दहा बारा दिवसात मग एक नवल घडले. आईला आलेल्या इंदरच्या पत्राच्या पाकीटात एक पत्र तिच्यासाठीही होते. त्याने इतर गोष्टींबरोबरच स्वत:ची एक कविता लिहून पाठवली होती. नोकरीला लागल्यापासून कविता करणे विसरलो होतो पण ’तिच्याशी’ गप्पा झाल्याने परत कविता स्फ़ुरल्याचा आवर्जून उल्लेख त्यात होता. पत्ररूपाने त्याच्याशी संवाद साधणे त्यानंतर सुरू झाले.. त्याच्या पत्रातल्या ’बूर्ज्वा’ या शब्दाचा अर्थ तिला कळलाच नाही. तेव्हा मग त्या एका ’शब्दावर’ त्याचे चार पानी लांबलचक उत्तर आले. शाळा, अभ्यास, परीक्षा यात दिवस आनंदाने जात होते. आणि त्या आनंदात या पत्रांच्या संवादाची भर पडत होती.

त्याला पत्रात लिहीण्यासाठी कविता जमवणे (कधीतरी स्वत: लिहिणे) चालू झाले.. एखादे पुस्तक ..चित्रपट आवडला की त्याच्याबरोबर ’शेअर करायला हवे’ हे आपोआप मनात यायचे.
इंदर दिवाळीत, मे महिन्याच्या सुट्टीत येत राहिला .तो असायचा तेवढे चार पाच दिवस नुसती धमाल असायची. एका सुट्टीत तो आला आणि एका सिनेमाची तिकीटे काढली आहेत असा फ़ोन आला. ती तिच्या मावसबहिणीसोबत थिएटरवर पोहोचली तोपर्यंत जरा उशीरच झाला होता.. इंदर सहज म्हणाला.. “आली नसतीस तर तिकीटे फ़ाडून टाकणार होतो”… ती पाहातच राहिली. आता अकरावीत.. कॉलेजमध्ये नुकतीच गेलेली ती.. इंदरबरोबर एक लोभस नाते तयार होत होते. कॉलेजमध्ये तिला इतरही मित्रमॆत्रिणी मिळाले होते. पण या नात्यात जास्त आनंद होता.

इंदरच्या बहिणीचे लग्न झाल्यापासून त्याच्या लग्नाचाही नातेवाईकांनी धोषा लावला होता. तीही त्याच्यात सामील झाली.. त्याला त्याच्या हॉस्टेलवरच्या मॆत्रिणीवरुन चिडवून झाले. मग एकदा लग्न व लग्नसंस्था यावर त्याच्याशी बोलणे हे ओघाने आलेच.

कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या दिवाळीच्या सुट्टीत इंदर आला. त्याने मुलगी पसंत केल्याची बातमी तिला मावसबहीणीकडून कळली होतीच. त्याचे मधल्या काळात पत्रही नव्हते.. त्याच्यावर ’मला का सांगितले नाहीस सर्वांच्या आधी’ असे रूसण्याचे मनात पक्के झाले होते. पण यावेळेला तिच्या एकटीशी इंदर बोललाच नाही. जो काही आला तो माणसांच्या गराड्यात.. आईला ती म्हणालीसुध्दा ’नेहमी तर पत्र पाठवतो मला.. मग ही आयुष्यातील महत्त्वाची बातमी का नाही कळवली. मी रागावले आहे त्याच्यावर’.. त्यावर शांतपणे आई म्हणाली ’अगं गडबडीत राहून गेलं असेल’.. ’मला’ सांगायला गडबडीत राहून गेलं.. डोळे नकळत पाण्याने भरले..

त्यानंतर एका नातेवाईकांकडे इंदर भेटला. बाहेर पडताना ते दोघेच बाहेर पडले. तो गप्पगप्पच होता. तो काहीतरी सांगेल अशी काही क्षण वाट बघून तिनेच न राहवून विचारले.. ’कशी आहे मुलगी… नाव काय आहे ? फ़ोटो तरी दाखव’.. मला तुझ्या लग्नाची साडीच घे बरं का” .. त्यावरही जुजबी उत्तरे देऊन त्याने विषय बदलला. तिचे कॉलेज कसे चालले आहे हे आवर्जून विचारले. खूप ठाम स्वरात म्हणाला.. नीट शिक.. तू फ़ार हुशार आहेस. मनात आणलंस तर कुठल्या कुठे जाशील. बोलता बोलताच त्याने एक रिक्षा थांबवली आणि तिला त्यात बसवून देऊन रिक्षावाल्याला पत्ता सांगितला..

तिच्या तोंडून तर शब्दच फ़ुटेना.. त्याला तिची पर्वा नाही म्हणावे तर त्याचे आत्ताचे शब्द काळजीतून आलेले होते.. मग लग्नाच्या बाबतीत का विषय टाळत होता तो ? घरी परतताना तर नुकताच घडलेला प्रसंग खरा आहे असे वाटतच नव्हते.. मग कित्येक दिवस आणि रात्री ’तो असा का वागला ?’ याच विचारात गेल्या.

लग्नाचे रीतसर निमंत्रण आले. आईने किती आग्रह केला तरी परीक्षा, अभ्यास याची कारणे सांगून तिने जाणे टाळले. तिचे शिक्षण पूर्ण झाले. नोकरी मिळाली..लग्न झाले.. मनासारखा जोडीदार लाभला. हळूहळू इंदर शेवटी जाताना असे का वागला हा प्रश्न मनाआड गेला..

आणि आज त्याच्या अचानक आलेल्या मेसेजने तो सल परत बोचायला लागला.

आज अचानक ’त्या’ मेसेजने सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मनाच्या तळाशी काहीतरी खोलवर जाऊन दडलेले असते.

इंदर त्याच्या ऑफ़िसच्या कामासाठी तिच्या शहरात येणार होता. भेटता येईल का? असा मेसेज होता. त्यांचे नाते पहाता त्याला घरी रहायलाच बोलविणे तिला आवडले असते. पण मधल्या काळात एक दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे एक दिवस संध्याकाळचे ’जेवायला ये’ असे निमंत्रण देऊन तिने त्याक्षणी मनातले विचार थांबविले.

ठरल्यादिवशी, ठरलेल्या वेळेला घरातील सर्वांसाठी रीतसर भेटवस्तू घेऊन इंदर आला. . सूपपासून स्वीट डिशपर्यंत नीट जेवण झाले. सुपारी झाली. जेवताना नवीन पुस्तके, चित्रपट, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम या विषयावर चर्चा झाल्या.

कोणे एके काळी इंदरला किती माहिती असते याचे तिला किती आकर्षण वाटले होते. आता तिलाही त्या सगळ्या विषयांमध्ये माहिती होतीच.. हरवला होता तो संवादातील सहजपणा. संवादात मोकळेपणा,
दुस-याशी शेअर करण्याची वृत्ती असणे आणि छाप पाडण्यासाठी माहितीचे प्रदर्शन करणे वेगळे असते. .. त्यामुळे इंदर उगाचच छाप पाडण्यासाठी ते सगळे संवाद वाढवतो आहे असे वाटले.

तिने मनाशी परत विचार केला. पूर्वग्रह मनात धरुन बघत होती का ती या सगळ्याकडे ? तिची हुशारी मनमोकळेपणाने कबूल करणारा इंदर आता तिच्यावर कुरघोडी करण्यासाठी बोलत होता. मूळ विषय बाजूला राहून ’मला किती माहिती आहे’ हेच सारखे त्यातून प्रकट होत होते.

बोलता बोलता रात्र अंधारली. घरातल्या सगळ्यांचा ऒपचारिक निरोप घेणे झाले. त्याला सोडण्यासाठी म्हणून ती बंगल्याच्या फ़ाटकापर्यंत आली. जुईचा गंध आवडणारी तिच्यातली ’ती’ तशीच होती. आणि अचानक तिला जाणीव झाली.. की पाऊस पडतो आहे. घरात बसून ते कळलेच नव्ह्ते. नाजूकसे थेंब पडत होते. जुईच्या पाकळ्यांवर अलगद पाऊस थरथरत होता. बागेतल्या दिव्याच्या प्रकाशवलयात पावसाचा शिडकावा दिसत होता. मनाला सुगंधित करणा-या त्या वातावरणात ती अजूनच हळवी झाली.

अनेक वर्षापूर्वी इंदर अचानक का सोडून गेला ते तो सांगेल.. त्याने ते सांगावे अशी अपेक्षा तिच्या मनात आली. त्या विचाराने ती विलक्षण चकित झाली. मनाच्या कप्प्यात ’तो अचानक गेला’ हा सल .. व त्याचबरोबर एकदा कधीतरी त्याने त्याचे कारण सांगावे ही अपेक्षा हातात हात घालून होती याची एखाद्या साक्षात्कारासारखी तिला जाणीव झाली.
स्वत:च्या मनाला आपण पूर्ण ओळखतो असे तिला नेहमी वाटे.. आज लक्षात आले की.. नात्यातले अनेक धागे, पीळ, गुंफ़ण आपल्या मनातील अदृश्य पातळीवर असतात.

हा सगळा मॆलोगणती प्रवास तिच्या मनाने काही सेकंदात केला. त्याला मात्र ते कळलेही नाही. इतकी वर्षे तिने बाळगलेली वेदना त्याच्या खिजगणतीतही नव्ह्ती. ऑफ़िसच्या ज्या कामासाठी तो आला होता त्याबद्दल तो आत्मीयतेने बोलत होता. त्यातही तिला उगाचच वाटून गेले की तो स्वत:चे काम, पंचतारांकित हॉटेलातील वास्तव्य याचे प्रदर्शन करतो आहे. परदेशात जाण्याच्या संधीचा आवर्जून उल्लेख त्यात होता. तिने व तिच्या नव-याने स्वखुषीने परदेशातील मानाच्या संधी सोडून भारतात राहणे स्वीकारले होते. तिचे १०-१२ देश बघून झाले होते.. ते इंदरला खुपते आहे म्हणून परदेशात जाण्याच्या संधीचा उल्लेख होतो आहे का?

“उगीचच असाच विचार करू नकोस.. “ स्वत:च्या मनानेच तिला फ़टकारले.

“परत भेटू.. “ इंदर जाताना म्हणाला. त्याच्या घरी यायचे आमंत्रण त्याने दिले नाही हा विचार तिच्या मनात अकारण चमकून गेला.

इंदर ’त्यावेळी’ असा का वागला हे कधीतरी परत भेटला की सांगेल ही आशा बाळगणे जास्त सोपे होते. आपण आपल्या जवळच्या माणसाकडून केलेली अपेक्षा त्याला समजली नाही हा नवीन सल मात्र आता कायमचा सोबती होता.

समाप्त..

संचित..

संचित..

स्टेशनचा गजबजलेला परिसर.. लोकल पकडण्याची प्रत्येकाची धांदल.. कोणाच्या मनात शानिवार, रविवार आता आनंदात घालवायची स्वप्ने.. कोणी शुक्रवारची संध्याकाळ ’ति’च्या सहवासात घालविण्यासाठी आतुर.. कोणी दोन दिवसांची सुट्टी एकट्याने कशी घालवावी या चिंतेत.. तर कोणी पाच माणसांच्या घरात एकांत कसा मिळेल याचा मनात विचार करतो आहे.

त्याच्याही मनात एक विलक्षण व्याकुळता.. लोणावळ्याला जाणारी लोकल पकडण्याची ही पहिली वेळ नव्हेच.. नोकरीच्या निमित्ताने पाच वर्षापूर्वीपर्यंत तर ते रोजचे आयुष्य होते.. मग पुण्यात नोकरी मिळाली. सुंदर, समजूतदार बायको.. एकुलता एक मुलगा.. घर, गाडी .. सगळे काही गेल्या पाच वर्षात जमले. आईला समजून घेणारी बायको मिळाल्याने तो दॆवावर जास्तच खुष होता. वडील गेल्या वर्षी गेले.. सावत्रपणाचा दुरावा वडिलांच्या वागण्यात कधी आला नाही. ते गेल्याचे दु:ख ताजे होते..

पण.. पण स्वत:च्या सख्ख्या वडिलांना न पाहिल्याची खंत मनातून कधीच गेली नाही. आईला जास्त वाईट वाटेल म्हणून शाळेत कालेजमध्ये मित्रांसोबत झालेली चर्चा तो घरी कधीच बोलून दाखवत नव्ह्ता.. पण मित्रांचे वडिल हक्क दाखवून रागवायचे.. चुकीच्या गोष्टींवर डाफ़रायचे.. ते ’सुख’ त्याला लाभले नाही. हा आपला सख्खा मुलगा नाही हे त्याच्या सावत्र वडीलांच्या मनातून कधीच गेले नाही. भरपूर खेळणी.. खाऊ.. कपडेलत्ते.. हवे ते शिक्षण घेण्याची मुभा .. सगळे काही त्यांनी दिले.. पण एक अंतर दोघांच्या दरम्यान कायम राहिले..

आईचे दु:ख त्याला लहानपणापासूनच जाणवायचे. अतिशय विलक्षण पध्दतीने तिची व वडिलांची ताटातूट झालेली होती. १९४५ च्या काळात त्याचे आजोबा मुलानातवंडांना घेऊन कराचीला उद्योगधंद्यासाठी गेले.. दोन वर्षे सगळे आलबेल होते. भारत पाकिस्तान फ़ाळणी ही स्वातंत्र्याची किंमत घेऊन आली..

त्याच धामधुमीत दंगली उसळल्या आणि त्याच्या वडिलांची इतर कुटुंबियांशी ताटातूट झाली. पुष्कळ शोध घेऊनही ते सापडले नाहीत. आपला जावई दंगलीत मारला गेला या विचाराने कितीही दु:ख झाले तरी ते दाखवायलाही क्षणाची उसंत नव्हती.
नाईलाजाने आजोबा लेकीला व नातवंडांना घेऊन भारतात परत आले. त्याची आई तेव्हा जेमतेम पंचविशीची.. तिच्यासमोर तर सगळे पुढचे आयुष्य पडले होते.. दोन मुले पदरात होती.. शिक्षण फ़ारसे नाही.. आजोबांनी एक धाडसी निर्णय घेऊन मुलीचे एका होतकरू तरूणाशी मुलीचे लग्न लावून दिले.

यावेळेस तो होता जेमतेम पाच वर्षांचा. पुढचे जीवन सुखात गेले. पण मनावर एक चरा उमटलेला घेऊन.. वडिलांचा फ़ोटोसुध्दा कधीच पाहिलेला नव्हता..

वर्षांमागून वर्षे उलटत गेली. काळ कधीच कोणासाठी थांबत नसतो. आणि अखेरीस कोणाचेच कोणावाचून अडत नसते. मनात एक ठसठसणारी वेदना घेऊन आपण सर्वजण पुढे जातो.

मागच्या आठवड्यात मात्र या सगळ्याला छेद देणारी एक विलक्षण घटना घडली. त्याला एक फ़ोन आला.. “….. तुम्हीच ना ?”

“होय , बोला काय काम आहे”?

“हं.. काम जरा वॆयक्तिक आहे.. आपण भेटू शकतो का?”

अनेकविध विचार त्याच्या मनात डोकावून गेले.

पण अखेरीस फ़ोनवर पलीकडच्या माणसाच्या बोलण्यातल्या आर्जवाला त्याने होकार दिला. दोन दिवसांनंतर संध्याकाळी एका हॉटेलमध्ये भेट ठरली. अतिशय उत्सुकतेने तो ठरलेल्या ठिकाणी वेळेच्या आधी पोहोचला.

’तो’ आलेलाच होता.. अंदाजावरुन त्याने नाव विचारुन पडताळणी केली व हस्तांदोलन घडले.

त्याला पाहिल्यापासून काहीतरी विलक्षण भावना मनात दाटत होत्या.

त्या माणसाने त्याला स्वत:चे पूर्ण नाव सांगितले .. ते ऎकून तो उडालाच. त्याच्या सख्ख्या वडिलांचे आईने सांगितलेले नाव त्याही माणसाच्या वडिलांचे होते..

“कसे शक्य आहे ?.. जाऊ दे.. एकाच नावाच्या व आडनावाच्या दोन व्यक्ती असणे फ़ार दुर्मिळ नाही..” दुस-या मनाने लगेच उत्तर दिले..

तो पुढे ऎकू लागला. तो माणूस हसला.. म्हणाला.. ’होय, तुझ्या मनात जे विचार चाललेत ते योग्य आहेत’. तुझे व माझे वडिल एकच होते.. “

“पण हे कसे शक्य आहे ?.. ते तर कधीच ..कित्येक वर्षांपूर्वीच गेले. आणि मी एकटाच मुलगा आहे त्यांचा..” हा म्हणाला.

तो माणूस म्हणाला.. “नाही.. ते पाकिस्तानातून जीव बचावून कसेबसे आले. तुम्हा सर्वांचा शोध घ्यायचा खूप प्रयत्न केला. तुम्ही सापडला नाहीत. मग त्यांनी पुनर्विवाह केला. माझा जन्म झाला. तुम्हा सर्वांची ते खूप आठवण काढायचे. त्यांच्या दृष्टिने तुम्ही दंगलीत मारले गेलात. अनेकदा त्यांच्या ओठांवर तुझे नाव यायचे. मागच्या वर्षी ते गेले. मागच्या महिन्यात अचानक तुला पुरस्कार मिळाला तेव्हाचा तुझा फ़ोटो व त्याखालचे नाव पाहून मी चमकलो. मग माहिती काढत गेलो. तुझ्या आईची माहिती कळली.. मग खात्री पटली की आपण दोघे भाऊ लागतो. तुझा फ़ोन नंबर शोधून फ़ोन केला. आणि आज आपण येथे आहोत”.

समाप्त

एक वेस ओलांडली..


एक वेस ओलांडली गाव एक दूर राहिले
एकट्याच वाटेस या दिशांनीच सांभाळले

इथेच मधेच क्षणॆक उगाच का मी थांबलो
सावलीत माझिया एकटा विसावलो
पुन्हा उन्हात चाललो
एक वेस ओलांडली गाव एक दूर चालले


उसासे फ़ुलांचे खुलासे सनांचे का मी ऎकतो
मातीच्या उरातल्या स्पंदनात गुंगतो पुन्हा मनात भंगतो
पावलास स्पर्श सांगतो गाव दूर दूर थांबले

संपल्या जुन्या खुणा जरी नवा ठसा दिसे प्रवासी पुन्हा
हाच खेळ संचिती असे
एक वेस ओलांडता गाव नवे दिसू लागले..


It is always important to know when something has reached its end. Closing circles, shutting doors, finishing chapters it doesnt matter what we call it; what matters is to leave in the past those moments in life that are over.

कोणतेही आयुष्यातील आवर्तन पूर्ण करण्याची वेळ आली आहे हे ओळखणे ..ते योग्यपणे पूर्ण करणे..आणि भूतकाळ मनातून काढून टाकून जगणे या तीन टप्पे हे गाणे विशद करते.

पण

बेनाम सा यह दर्द ठहर क्यूं नहीं जाता
जो बीत गया हॆ गुजर क्यूं नही जाता

अशी अवस्था भूतकाळातील कोणत्याही घटनेबद्दल सर्वांचीच असते.

आयुष्यातील एक प्रकरण संपवून या गाण्यातील प्रवासी दूर निघाला आहे. वाटेत उन आहे..आणि फ़क्त स्वत:ची सावली..जुन्या आठवणींनी क्षणभर थबकणे साहजिक आहे.पण पुढे निघणे तितकेच अपरिहार्य..

पण या जुन्या अनुभवाने 'तो' निराश झाला असला तरी हताश नाही.कळ्याफ़ुलांच्या हाका..मातीतून इवले लवलवणारे कोंब त्याला खुणावतात..आयुष्य जगण्यासाठी आहे या़ची एकीकडे प्रचीती येत असतानाच मनात ती दुखरी ठसठ्सती कळ उमटते..ह्रुदय भंगते..'तो' गाव दूर गेल्याची वेदनाच नुसती उरते.

नवीन काहीतरी हाका घालतंच..जरा प्रवास केल्यावर नवी वेस दिसते..नवीन घाव सोसण्यासाठी 'तो' परत एकदा सिध्द होतो.

अतिशय सकारात्मक द्रुष्टिकोन मांडणारं हे गाणं आहे. वरवर जरी मागे गेलेला गाव ही एक प्रेयसी वाटली तरी प्रत्यक्षात 'ती' शिक्षणाची संधी,नोकरी,हुकलेले काहीही असू शकते..किंवा कोणतेही नाते असू शकते. मागे काही गेले याची अवाजवी खंत न बाळ्गता आयुष्याचा प्रवास 'पुढची वेस' दिसेपर्यंत उमेदीने..सगळे क्षण 'जगत' चालू ठेवायचा असतो हे समर्पकपणे सांगणारे गीत.

श्रीधरजींनी गाण्यातून ही कविता आपल्यापर्यंत पोहोचविली आहे हे त्यांचे ऋण मानायला हवे.संगीत नेहमीप्रमाणेच योग्य.पहिल्या कडव्यात 'तो' निराश आहे हे आणि शेवटच्या कडव्यात 'सावरला' आहे हे उच्चारांच्या किमयेतून कसे कळते ते मुळातून अनुभवायला हवे.'क्षणॆक' मधे 'क्षण' थांबल्याचा भास होतोच. 'हाच खेळ संचिती असे' यात 'दॆव' याबद्दल एक हताशता जाणवेल असा 'संचित' हा शब्द कानावर येतो. एखाद्या लांबलचक बोगद्यातून प्रकाशकिरणाच्या टोकाकडे श्रीधरजीं आपल्याला या गाण्यातून प्रवास घडवितात.

हे गाणे ऎकताना निरनिराळ्या संदर्भात गुलजारचे 'मुसाफ़िर हू यारों' आठवतेच..विशेषत: 'एक राह रुक गयी तो ऒर जुड गयी' ही ओळ..

जळण्याचे बळ तूच दिले रे


. जळण्याचे बळ तूच दिले रे, दे आता जगण्याचे
कणकण फ़ुलण्याचे बळ दिधले, तसेच दे झिजण्याचे

आकाशासम धुंद बरसलो रचित दिनान्त दिगंती
माध्यान्हासम क्षालो दधी मज पिऊ दे शांत निवांती
मत्त चांदणे प्यालो त्यापरी घनतम गिळू दे आता
अगणित नक्षत्रांच्या द्वारे जड होई तो माथा..

धुवाधार मी प्रपात झालो जॆसा लक्ष स्वरांचा
जाऊनी उगमी भेदू दे मज स्थिरही मदिरी मॊनाचा
आनंदांकुर होऊन जॆसा आलो रुपाकारा
सुटूनी त्यातून घेऊ दे मज मूळ अरुप निवारा..

बा.भ.बोरकर..


१. हे गगना अल्बममधील श्रीधरजींनी संगीत दिलेले व स्वत: गायलेले हे गीत.. त्यांचा आवाज या गाण्यात सुधीर फ़डकॆ यांच्यासारखा वाटतो. पण बाज स्वतंत्र आहे. मला ही कविता आणि गाणे दोन्ही अतिशय प्रिय आहे.

संगीत सुरेख.. 'पिऊ दे शांत निवांती'.. मधला 'निवांतपणा' .. 'धुंवाधार प्रपाताचा' रोरावत येणारा आवाज.. 'आनंदांकुर' मधला खरोखर गवताचे वा-यावर डोलणारे पाते डोलावे तसा हेलकावा.. 'अगणित' शब्दातून निर्माण होणारा अगणितपणा.. संगीत, शब्दोच्चार व आवाज यांच्या साहाय्याने प्रकट होते.

'त्या नदीच्या पार वेड्या यॊवनाचे झाड आहे'.. किंवा 'जपानी रमलाची रात्र' अशा कविता लिहिणा-या बोरकरांची ही जरा तत्वज्ञानाकडे झुकणारी कविता..आपल्या पुलंनी त्यांच्यावर 'बाकीबाब : एक आनंदयात्री' असा अप्रतिम लेख लिहिलेला आहे.. त्यातून मला बोरकर प्रथम भेटले..

यज्ञी ज्यांनी देऊनी निज शिर.. घड्ले मानवतेचे मंदिर..
परि जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती..
तेथे कर माझे जुळती..

या गाण्याने त्यांच्या कवितेशी परिचय वाढला.. ..

ही वरची कविता

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाचि अंत..

या ओळींसारखा आहे.. जीवनात चढावर सगळे खुष असतात.. वार्धक्य ..उतरता काळ कोणालाच नको असतो. तारुण्य भोगायचे सामर्थ्य मागावे लागत नाही.. पण विझण्यासाठी बळ मागावे लागते.. सगळ्या चांगल्या क्षणांमधे आपण कधीच मला हे सुख का लाभले ?.. असे विचारत नाही. दु:खात मात्र माझ्याच नशिबी हे का ? असे सह्ज म्हणतो..

मत्त चांदणे प्यालो त्यापरी घनतम गिळू दे आता..

या ओळीत तो अर्थ आला आहे..

आनंदांकुर होऊन जॆसा आलो रुपाकारा
सुटूनी त्यातून घेऊ दे मज मूळ अरुप निवारा..

यात मात्र सरळ अरूप म्हणजे देहाच्या पलीकडे जाण्याचे मागणे आहे. चॊ-याएंशी लक्ष योनींनंतर मानवाचे आयुष्य लाभते असे म्हणतात.. त्यामुळे सर्व संत महात्मे या जन्मानंतर जन्म मरणाच्या फ़े-यातून सुटका मागतात.. तेच मागणे बोरकरांनी यात मागितले आहे.. हे गाणे सुरु झाले की संपेपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते.. फ़ुलणे आणि विझणे श्रीधरजी अचूक उभे करतात

.असे विझण्याचे बळ मागणारा कवी एकीकडे..

तुला कसे कळत नाही फ़ुलत्या वेलीस वय नाही..
क्षितिज ज्याचे थांबले नाही त्याला कसलेच भय नाही..
त्याला कसलाच क्षय नाही त्याला कसलेच भय नाही...

असेही सहज लिहून जातो.. अशी क्षितिजाकडे द्रुष्टी असणा-यांना विझण्याचे बळ मागावे लागत नाही. ते मिळतेच.

काही बोलायाचे आहे


काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची कधी फ़ुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गल्बत रुपेरी
त्याचा कोश किनार्यास कधी लाभणार नाही

तुझ्या क्रुपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्यात कधी तुला जाळणार नाही

कुसुमाग्रजांची एका अतिशय मनस्वी माणसाचे ह्र्दगत व्यक्त करणारी कविता. गाणे म्हणून ऎकण्याआधी अनेक वर्षे मला ही माहिती होतीच. माझ्या स्वत:च्या स्वभावाशी साधर्म्य सांगणारी म्हणून लाडकी.. यात खरे चटका लावते ते शेवटचे कडवे..

तुझ्या क्रुपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्यात कधी तुला जाळणार नाही

'प्रेम कुणावर करावं' हे अतिशय महान,चिरंतन सत्य सांगणार्या कुसुमाग्रजांनी या वरील दोन ओळींत 'प्रेम कसं करावं' हे अदभुतपणे सांगितलं आहे असं मला नेहमी वाटतं.

एखाद्याने / एखादीने आपल्या आयुष्यात आणलेले प्रेम हे त्याचा 'धनी' झालो म्हणून क्रुतज्ञ पणे त्याचा स्वीकार आणि आनंद मानावा..त्याचा कोणताही त्रास त्याला /तिला होऊ नये याची काळजी घ्यावी हे महान तत्व यात आले आहे.

श्रीधरजींना लोक 'फ़िटे अंधाराचे जाळे' 'ओंकार स्वरुपा' इतकेच या गाण्यासाठी ओळखतात. यातील भाव गाण्यात फ़ारच योग्यपणे व्यक्त झाले आहेत. मनस्वीपणा जाणवतो.हे शब्द उच्चारणारा माणूस एकाकी आहे पण हेकट, दुराग्रही नाही..तो कलंदर आहे..'हम हॆ राही प्यारके' अशी त्याची मनोव्रुत्ती आहे.. ते यात गाणे म्हणून स्पष्ट होते. 'एकटा मेघ' 'गल्बत' इतर अनेक गाण्यांप्रमाणेच उच्चारांवरुन नजरेसमोर येऊन मन व्याकुळ करते. शेवटच्या दोन ओळी जास्त ठासून म्ह्टल्या जातात कारण तोच त्याचा सारांश आहे.

श्रीधरजींचा वेगळेपणा मला जाणवून त्यांच्या गाण्याच्या प्रेमात मी पडले त्यातील हे पहिले गाणे..

दोन रात्रीतील आता


दोन रात्रीतील आता संपला वेडेपणा
वेड पांघरण्यात होता वेगळा वेडेपणा

वाजली वेडी कडी अन दार हे शहाण्यापरी
मोगरा माळून आला देखणा वेडेपणा

उंबरा ओलांडताना धीट हे झाले धुके
ही धिटाई झेलताना लाजला वेडेपणा

अजून मजला कळत नाही वेड कोणी लावले
वेड मज हा लावणारा कोणता वेडेपणा..?

या गाण्याबद्दल 'अजून मजला कळत नाही वेड कोणी लावले' या शेवटच्या ओळी माझ्यासाठी अ़क्षरश: खर्या आहेत. यातील शब्द,स्वर,उच्चार ..भावार्थ कोणी खरे वेड लावलेले आहे ते आजतागायत कळलेले नाही. 'ओलांडताना'मधला 'लां' लांबविलेला आहे. नीट ऎकले तर 'ओलांडून' ती मुग्ध युवती आत येते आहे असे वाटते. हे गाणे ऎकण्याआधी मी प्रवीण दवणे यांच्या कविता फ़ारशा ऎकलेल्या नव्ह्त्या.पण ही रचना मस्त आहे. दवणे यांच्याच 'रंग किरमिजी' मध्ये एक 'भग्न भाव' आहे. आणि या वरच्या गाण्यात 'मुग्ध प्रणय..'

'राखी सावंत' च्या जमान्यात हे गाणे जुनाट ठरेल. पण फ़ार गहिरे,नाजुक भाव यात व्यक्त होतात. 'मोगरा' या शब्दावरुन मला नेहमीच कुसुमाग्रजांच्या 'मोगरा' या कवितेची आठवण होते.

असा मोगरा
समोर फ़ुलता
दूरपणाचा
द्त्तक बाणा
कसा रहावा

मलयगंध
देहात दाटता
गतागताचा
शीर्ण नकाशा
कुणी पहावा

इंद्रजाल हे
असे उमलता
स्वप्न म्हणे
ही जमीन माझी
घटकेकरिता

सागर विसरुनि
धवल फ़ुलांनो
तुमच्यासाठी
उभी राहिली
जीवन सरिता

यातील अंतरा ऎकला तर 'तो' वेडेपणा आता 'संपला' आहे असे काहीसे खिन्न भाव कळतात..आणि मुखडा ऎकताना जुन्या आठवणीत रममाण होताना माणूस हळवा, म्रुदू होतो..तसेच स्वर,शब्दोच्चार येतात. आणि माझी खरी 'दाद' आहे ती 'हाय' या मधल्या एका उच्चाराला...या गाण्याने लावलेले वेड कधी संपूच नये असे वाटायला लावणारे एक सुरेल गीत..

तुला पाहिले मी नदीच्या किनारी


तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे

तुझी पावले गे धुक्याच्या महाली
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नदीचा किनारा
न माझी मला अन तुला सावली

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा चंद्र हा डोंगरी मावळे
पुढे का उभी तू तुझे दु:ख झरते
जसे संचिताचे ऋतू कोवळे

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातून ही मंद ता-याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा

श्रीधर फ़डके यांनी गायलेले व स्वरबध्द केलेले हे माझे सर्वात लाड्के गाणे...ग्रेससारख्यांच्या कवितेला चाल लावणे हेच मुळात आव्हान..ते यात फ़ार समर्थपणे पेलले गेले आहे. यात एक music piece गाण्याच्या शेवटी वाजतो..तो ऎकेपर्यंत गाणे संपले असे मला वाटतच नाही इतका तो गाण्याचा भाग आहे. 'धुक्याच्या महालातील पावले' ऎकताना मला धुपाचा धूर होतो तशा धुरात दोन नाजुक अस्फ़ुट पावले दिसतत.यात 'गर्द' हा शब्द श्रीधरजी असा काही गातात की क्षणात मनाला निळ्या गर्द आकाशाखाली आपण व्याकुळपणे उभे आहोत असा भास होतो. 'चंद्र मावळे' यात अचूकपणे स्वर असे खाली येतात की .. 'मावळणे' जाणवावे. 'दु:ख' हा शब्द उच्चारण्याबद्दल तर लिहायलाच नको. 'आकांत' असा काही येतो की मनात कल्लोळ माजतो. 'शब्दचित्र' या शब्दाचा अर्थ अशी गाणी ऎकताना उलगडतो..प्रथम हे गाणे ऎकल्यावर मला 'तलत मेहमूद' यांचे एखादे आर्त गीत ऎकते आहे असा भास झाला. स्वररचना, शब्द..आवाज सर्व अतिशय जमलेले एक उत्तम गाणे..परत परत अनेकदा ऎकावे असे वाटणारे सुरेख,अप्रतिम गीत..कितीही याबद्दल लिहिले तरी कमीच..

अवेळीच केव्हा दाटला अंधार


अवेळीच केव्हा दाटला अंधार
तिला गळा जड झाले काळे सर
एकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले
हासताना नभ कलून गेलेले

पुन्हा मी पाहिले तिला अंगभर
तिच्या काचोळीला चांदण्याचा जर
आणि माझा मला पडला विसर
मिठीत थरके भरातील ज्वार

कितीक दिसांनी पुन्हा ती भेटली
तिच्या पोटी कुण्या राव्याची सावली
जरा डोळियांत तिच्या मी पाहिले
काजळात चंद्र बुडून गेलेले

ना.धों.महानोर

या गाण्याबद्दल लिहीण्याची इच्छा खूप होती पण धीर होत नव्हता. मला याचा अर्थ जो वाटतो तो लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. कोणी वेगळे काही interpret केले असेल तर जरुर सांगा.

या कवितेतील 'ती' त्याची प्रेयसी असावी. तिचे तिच्या मनाविरुध्द लग्न झाल्यामुळे.. 'तिला गळा जड झाले काळे सर'..आणि मग त्याच्या आयुष्यात 'अवेळीच दाटला अंधार'... अनेक दिवसांनी अवचित भेटल्यावर तिच्या विषण्ण हासण्याचे वर्णन 'हासताना नभ कलून गेलेले' यात येते. 'कलून' हा शब्द ऎकताना मनात कालवाकालव होते इतका अप्रतिम गायला गेला आहे.

तिला लग्नानंतर पाहिल्यावर 'ती' आधी 'त्याची' असल्याने तो तिच्याकडे बघतो.. ते वर्णन पहिल्या कडव्यात आहे. यात 'अंगभर', 'तिच्या काचोळीला चांदण्याचा जर' तसेच 'थरके ' हे श्रीधरजींचे उच्चार ऎकल्यावरच कळेल की ते किती भावपूर्ण, शब्दांना न्याय देणारे गाणे गातात. 'थरके' मध्ये ते बेभान थिरकणे जाणवतेच..

दुसर्या कडव्यात तिला झालेले मूल दुसर्याचे आहे..यामुळे तिच्या डोळ्यातील चंद्र बुडून म्हणजे दु:खात काजळून गेले आहेत. 'कितीक दिसांनी'..ऎकताना विदग्ध, एकलेपणाची व्यथा कळेल असे सूर आले आहेत. फ़ार जीवघेणे वर्णन या गाण्याच्या शब्दात आहे.. ते तितकेच खोल गाण्यातूनही पोहोचते. 'रंग किरमिजी' याच धर्तीचे नंतरचे गाणे..तेही असेच एक 'जमलेले' गाणे आहे.
अशी गाणी ऎकल्यानंतर दीर्घकाळ एक कातर मूड अंतर्मनात रहातो.. तेच त्याचे खरे यश असते.