Tuesday, March 25, 2008

काही बोलायाचे आहे


काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्पकुसुमांचा दाटे
पण पाकळी तयाची कधी फ़ुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गल्बत रुपेरी
त्याचा कोश किनार्यास कधी लाभणार नाही

तुझ्या क्रुपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्यात कधी तुला जाळणार नाही

कुसुमाग्रजांची एका अतिशय मनस्वी माणसाचे ह्र्दगत व्यक्त करणारी कविता. गाणे म्हणून ऎकण्याआधी अनेक वर्षे मला ही माहिती होतीच. माझ्या स्वत:च्या स्वभावाशी साधर्म्य सांगणारी म्हणून लाडकी.. यात खरे चटका लावते ते शेवटचे कडवे..

तुझ्या क्रुपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी
त्याच्या निखार्यात कधी तुला जाळणार नाही

'प्रेम कुणावर करावं' हे अतिशय महान,चिरंतन सत्य सांगणार्या कुसुमाग्रजांनी या वरील दोन ओळींत 'प्रेम कसं करावं' हे अदभुतपणे सांगितलं आहे असं मला नेहमी वाटतं.

एखाद्याने / एखादीने आपल्या आयुष्यात आणलेले प्रेम हे त्याचा 'धनी' झालो म्हणून क्रुतज्ञ पणे त्याचा स्वीकार आणि आनंद मानावा..त्याचा कोणताही त्रास त्याला /तिला होऊ नये याची काळजी घ्यावी हे महान तत्व यात आले आहे.

श्रीधरजींना लोक 'फ़िटे अंधाराचे जाळे' 'ओंकार स्वरुपा' इतकेच या गाण्यासाठी ओळखतात. यातील भाव गाण्यात फ़ारच योग्यपणे व्यक्त झाले आहेत. मनस्वीपणा जाणवतो.हे शब्द उच्चारणारा माणूस एकाकी आहे पण हेकट, दुराग्रही नाही..तो कलंदर आहे..'हम हॆ राही प्यारके' अशी त्याची मनोव्रुत्ती आहे.. ते यात गाणे म्हणून स्पष्ट होते. 'एकटा मेघ' 'गल्बत' इतर अनेक गाण्यांप्रमाणेच उच्चारांवरुन नजरेसमोर येऊन मन व्याकुळ करते. शेवटच्या दोन ओळी जास्त ठासून म्ह्टल्या जातात कारण तोच त्याचा सारांश आहे.

श्रीधरजींचा वेगळेपणा मला जाणवून त्यांच्या गाण्याच्या प्रेमात मी पडले त्यातील हे पहिले गाणे..

No comments: