Tuesday, March 25, 2008

कधी रिमझिम


कधी रिमझिम झरणारा आला ऋतू आला
कधी टपो-या थेंबांचा आला ऋतू आला
कधी पुलकित हर्षाचा
हळव्या क्षणस्पर्शाचा..
आला ऋतू आला

पानावर थिरकत नाचे पाणी
मनामध्ये जुळतात गाणी दिवाणी
साद गंधातूनी
ओल्या मातीतूनी
आला ऋतू आला

अंग अंग स्पर्शतात मोती रुपेरी
आठवे ती भेट आधी अधुरी
मन चिंब ओले
शहारत बोले
आला ऋतू आला

हा पाऊस वागे तुझ्यासारखा
हा येतो नि जातो तुझ्यासारखा
उन पावसाचा
खॆळ श्रावणाचा
आला ऋतू आला

..नितीन आखवे..


तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता कधी यायचा पाऊसही.. ..संदीप खरे..

'पाऊस' या विषयावर कविता लिहिली नाही असा कवी सापडणे मुष्किल.. तेजोमय नादब्रम्ह याच अल्बममध्ये ही रचना आहे. सुरेश वाडकर यांनी गायली आहे. रिमझिम झरणा-या पावसाची आठवण जितकी लोभस.. आणि त्याचा स्पर्श जसा हळुवार तसेच हे गाणे मनाला ह्ळुवार स्पर्श करुन जाते. ओल्या मातीचा वास 'मृदगंध' गाणे ऎकताना मनात दरवळतो. 'ति'ची भेट आठवते.. रजनीगंधा सिनेमातला छत्रीची गळकी बाजू आपल्या डोक्यावर धरणा-या माणसाचे हे गाणे आहे असे मला नेहमी वाटते.

रिमझिम के तराने लेके आयी बरसात
याद आयी किसीसे वह पहली मुलाकात..

मधल्या गीता द्त्तचा नटखट व रफ़ीचा मुलायम आवाज हे गीत ऎकून नक्कीच आठवतो..

गाणं म्हणून परत एकदा श्रीधरजींच्या अचूक कविता निवडण्याला दाद.. 'ऋतू आला' या शब्दांच्या चालीत हवासा वाटणारा 'तो' आल्याचा लाडिक आनंद सामावला आहे. 'पानावर थिरकत नाचे पाणी' मध्ये पानावर अलगद थरथरणारे दंवबिंदू दिसतात..

हेही गाणे मला स्वत: श्रीधरजींकडून ऎकण्याचा योग आला होता. आणि उन्हाळा असून बाहेर पाऊस पडत असल्यासारखे वाटावे इतके हे गाणे ते सुंदर गायले.. !

हा पाऊस वागे तुझ्यासारखा
हा येतो नि जातो तुझ्यासारखा
उन पावसाचा
खॆळ श्रावणाचा
आला ऋतू आला..

यावरुन मला नेहमीच कुसुमाग्रजांची एक कविता आठवते..


आल्या आल्या म्हणतेस
आता
पुन्हा कधी जाणार नाही

जाता जाता म्हणतेस
आता
पुन्हा कधी येणार नाही

येणं जाणं कुणास ठाऊक
घडेल कसं ?
वा-यावरती तरंगणारी
सारीच पिसं

नसतानाही भरपूर असतेस
एवढं तुला कळणार नाही..

No comments: