Tuesday, March 25, 2008

तल्लीन गोविंदे....


पुष्कळ दिवस अधीरपणे वाट पाहिल्यावर आणि नेहमीच्या दुकानदाराकडे खेपा घातल्यावर ही cassette हातात आली. ती घेतल्यावर मनाचा ठाव घेतला ते त्रिभंगी देहुडा या अभंगाने.. हा अभंग शब्द,स्वर, आवाज, वाद्ये याने असा काही जमला आहे की एकदा ऎकून चॆन पडत नाही.

पहिला अंभंग आहे तो ज्यावरुन शीर्षक दिले आहे तो..

पावया छंदे तल्लीन गोविंदे
नाचती आनंदे गोपाळ कॆसे

यमुनेच्या तीरी गाई चारी हरी
गोपाळ गजरी आनंद्ले

ठायी ठायी पेंधा पॆ नाचतु
वाकुल्या दावितो हरी..छंदे..

ठायी ठाती उभ्या विसरल्या माया
हाकितु लवलाया क्रुष्ण हरी हरी

ज्ञानदेवा जिवी क्रुष्णचिरंजीवी
गोपाळ रंजवी प्रेमभक्ता

..संत ज्ञानेश्वर..


या अभंगातील शब्दरचना या विषयावर लिहिण्याचा अधिकार माझा नाही. ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग असल्याने आशय किती खोलवर असेल त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच. आवाज आणि संगीत याबद्द्ल लिहिण्याचे धाडस मात्र करणार आहे.

या अभंगाची चाल मनाचा ठाव घेते. आधी लिहिल्याप्रमाणे हे कसेट्मधील पहिले गाणे आहे. ते ऎकण्याआधीच्या क्षणी मनाची स्थिती काही असली तरी गाणे खरे तर .. त्याआधीचे नुसते संगीत सुरू झाल्याक्षणी चित्तव्रुत्ती उल्हसित होतात. श्रीधरजींच्या इतर गाण्यांप्रमाणेच शब्दचित्र रेखाटण्याची किमया यातही आहे. यमुनेच्या काठावर खेळणारे श्रीक्रुष्णासोबतचे साथी डोळ्यांसमोर येतात. 'वाकुल्या दावितो हरी'..मधे संगीताच्या किमयेने तो 'हरी' साक्षात वाकुल्या दाखवितो आहे याची मजा आणि आनंद अनुभवायलाच हवा. ते शब्दात मांडणे शक्य नाही. हे संगीताचा समर्पक वापर म्हणजे काय याचे साक्षात उदाहरण आहे.

हे गाणे गोपाळांचे सहज खेळाचे वर्णन असले तरी ... सावळ्या श्रीक्रुष्णाचे गीता सांगणारे उदात्त धीरगंभीर रूप.. 'क्रुष्णचिरंजीवी.. गोपाळ रंजवी' यात सुरेश वाडकर यांच्या आवाजाच्या आणि स्वरांच्या साहाय्याने समोर येते.

तालावर डोलायला लावणारे एक नादमय गाणे.. तल्लीन शब्दाची व्याप्ती.. किंवा ती अवस्था 'कळण्या'साठी हे गाणे मद्त नक्की करेल...

२.कोमल वाचा दे रे राम
विमळकरणी दे रे राम

प्रसंग ओळखी दे रे राम
धूर्तकळा मज दे रे राम
हितकारक दे रे राम
जनसुखकारक दे रे राम
अंतरपारखी दे रे राम
बहुजन मॆत्री दे रे राम

संगीत गायन दे रे राम
आलापे गोडी दे रे राम
धात माता दे रे राम
अनेक धाटी दे रे राम
दस्तक टाळी दे रे राम
न्रुत्यकला मज दे रे राम

पावनभिक्षा दे रे राम
दीनदयाळा दे रे राम
सज्जन संगती दे रे राम
अलिप्तपण मज दे रे राम
मजवीण तू मज दे रे राम
दास म्हणे मज दे रे राम..

समर्थ रामदास..


या गाण्याबद्द्ल पहिला आणि महत्वाचा अभिप्राय म्हणजे.. 'कोमल वाचा दे रे राम' हे मागणे मागायची स्व्त: श्रीधरजींना अजिबात गरज नाही.त्यांच्याशी ओळख असलेल्या सर्वांना हे पटेल. कारण ते अतिशय म्रुदू ..कोमल स्वरात विनम्रपणे बोलतात. यात अतिशयोक्ती करण्याचा हेतू नाही.

'त्रिभंगी देहुडा' नंतरचे माझे या अल्बममधील हे आवडते गाणे.. हे गाणे अल्बममधे सहाव्या क्रमांकावर आहे.म्हणजे ते सुरु होईपर्यंत श्रोते भक्तिरसात बुडालेले असतात. कोमल, शांत, गंभीर आर्त अशा स्वरात 'रामा' कडे हे मागणे मागितलेले आहे. 'प्रपंच करावा नेटका' असे रामदासस्वामी सांगतात. तो 'नेटका' करण्यासाठी अनेक गोष्टींची गरज असते. अंगात अनेक गुण असावे लागतात. ते या अभंगात येतात.

इतके सगळे आल्यावर मुख्य म्हणजे अलिप्तपण यायला हवे.. कमळाच्या पानासारखे पाण्यात राहून ते पाणी अंगाला लागू द्यायचे नाही हे जमावे लागते. मला श्रीधरजींनी गायलेले बा.भ.बोरकर यांचे 'जळण्याचे बळ तूच दिले रे' हे 'हे गगना' मधील गाणे फ़ार प्रिय आहे. त्यात त्यांचा जो आवाज आहे त्याची आठवण 'कोमल वाचा' ऎकून आली. 'दे रे राम' हे यात वीसवेळा गायले गेले आहे. आणि ते दरवेळेला वेगळ्या पध्द्तीत गायले गेले आहे.. थोर संगीतकार आणि गायक याची ती लक्षणे आहेत.

अलिप्तपण यावरून नुकताच घडलेला एक प्रसंग लिहिण्याचा अनावर मोह होतो आहे.. माझ्या कामाच्या ठिकाणी काही कारणाने 'कल्पना चावला' यांचे वडिल आले होते. वयाच्या बाराव्या वर्षी पाकिस्त्तानातून पळून आल्यावर जगण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. टायर बनविण्याचा कारखाना काढला. सामाजिक कार्यही खूप केले.ते सांगत होते की ..अनेक योगी साधूंना भेटलो.प्रत्येकाला एक प्रश्न आवर्जून विचारला.. 'की अनेक विद्या असतात तशी इहलोकात मिळवलेले 'वर' घेऊन जायची विद्या असते का ?'.. याची सतत जाणीव ठेवून वागायला हवे. 'मजविण तू मज दे रे राम' याचा अर्थ मला कळला आहे असे नाही. पण 'अहंकार' असलेला 'मी' त्याविण माझा मी मला दे असे रामाला यात विनवले आहे. फ़ार अवघड सूक्ष्म मागणे आहे.

संतांच्या रचनांतून नेमक्या निवडून त्यांना सुरेख, चपखल चाली लावण्याचे काम 'तल्लीन गोविंदे' मधे श्रीधर फ़डके यांनी केले आहे. अशीच त्यांची नवनवीन गाणी 'मज दे रे राम'..

No comments: