Wednesday, March 26, 2008

दिवे देहात स्पर्शाचे


दिवे देहात स्पर्शाचे जळाया लागले होते
तुझ्या बाहूत मी जेव्हा ढळाया लागले होते

ऋतू एकेक स्वप्नांचे फ़ुलाया लागले होते
तुझ्याशी रेशमी नाते जुळाया लागले होते

तुला मी सांगण्या आधी
मला तू सांगण्याआधी
मनातील एकमेकांना कळाया लागले होते

तुझ्यामाझ्यातील जेव्हा
गळाली बंधने सारी
सुखाचे शहर चंदेरी दिसाया लागले होते

दंवाने चिंब झालेल्या कळीचे फ़ूल होताना
पहाटे स्वप्नरंगांनी दिशा उजळून येताना
मला आकाश पूर्वीचे मिळाया लागले होते

गीत : अनिल कांबळे
संगीत : श्रीधर फ़डके
गायक : श्रीधर फ़डके / अनुराधा पॊडवाल
अल्बम : अबोलीचे बोल

अगदी एक सहज वाटणारं प्रेमगीत.. युगुलगीत.. असं या गाण्याचं चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं.. पण एके रात्री निवांतपणे गाडी चालवत असताना गाणं जरा जास्त लक्षपूर्वक ऎकलं. आणि त्यातील 'सुखाचे शहर चंदेरी' मला दिसले.

तुला मी सांगण्या आधी
मला तू सांगण्याआधी
मनातील एकमेकांना कळाया लागले होते

याचा अनुभव प्रेमात पडल्यावर येतो... पण

तुझ्यामाझ्यातील जेव्हा
गळाली बंधने सारी
सुखाचे शहर चंदेरी दिसाया लागले होते..

ही बंधने किती आणि कोणती 'गळाली' हे ज्याचे त्याने ठरवावे.. ती गळाली आहेत हा अनुभव फ़ार फ़ार वॆयक्तिक असतो. आणि ती जाणीव फ़ार सुखद असते. कारण

प्रीतीची वाट नेहमीच जात असते अथांग जळातून
वाळूवरच्या पावलांनी तिचा माग लागत नसतो..

पण एकेक पापुद्रा निघत जातो.. तसतसे त्या रेशमी नात्यातील पदर उलगडत जातात.. यात 'मी' पणाचेही बंधन कधीतरी गळून पडते.....

जवळपणात होतो दूर आता दुरून झालो जवळ
म्हणू नकोस जाणूनबुजून मीच माया केली पातळ

तशी आठवण येत नाही भेटीचीही काय जरूर ?
सूर वाहे ऊर भरुन घरांत देखील चांदणे टिपूर

इतके दिवस हसत रुसत वाटले सृष्टीत नटली आहेस
आता कळते खोल खोल माझ्याच दॄष्टीत मिटली आहेस

गंध होऊन हुलकावण्यांनी अवतीभवती राहिलीस खेळत
आता माझ्यात श्वास होऊन वहात असतेस सहज नकळत

कधी कामात कधी गाण्यात फ़ुलताफ़ळता भानात नसतो
तुला विसरुन अष्टौप्रहर तुझ्यात असतो

आता तारे पिकत चालले आकाश झाले निरभ्र निवळ
दुरुन जवळ झालो तसे क्षितिजदेखील आले जवळ...

बा.भ.बोरकर

'तुला विसरुन अष्टौप्रहर तुझ्यात असतो'.. यात सगळी बंधने गळाली आहेत असे लक्षात येते.

दंवाने चिंब झालेल्या कळीचे फ़ूल होताना
पहाटे स्वप्नरंगांनी दिशा उजळून येताना
मला आकाश पूर्वीचे मिळाया लागले होते

प्रेमात पडल्यावर परत एकदा आयुष्यातले सोनेरी दिवस जागे होतात..

आकाश पाणी तारे वारे सारे
सारे सारे ताजे होतात
वर्षांच्या विटलेल्या बधीर मनाला
आवेगांचे तुरे फ़ुटतात..

याचा प्रत्यय येतो..

पाऊस या विषयाप्रमाणेच प्रेम या विषयावर कविता न लिहिलेला कवी सापडणे दुर्मिळ..

'ऋतू एकेक स्वप्नांचे'.. खरोखर फ़ुलाया लागले आहेत असे वाटावे असे ते शब्दोच्चार येतात.. श्रीधरजींची युगुलगीते फ़ारशी नाहीत. पण या कवितेशी. गाण्याशी मनाचे नाते या गीतातून नक्कीच जोडले जाते..

1 comment:

Nitin Kulkarni.... said...

sagalach blog far sunder banawala ahes....
comments khup abhayaspurn ahet... ani thet hrudaysparshi....
hrudayatun alele...
references pan changale ghetale ahes itar kavitanche...
ani tuzi niwad tar sunderach.. sagalech fav catagorymadhe modanare....
thanks.. khup nave arth umagale....