Tuesday, March 25, 2008

जळण्याचे बळ तूच दिले रे


. जळण्याचे बळ तूच दिले रे, दे आता जगण्याचे
कणकण फ़ुलण्याचे बळ दिधले, तसेच दे झिजण्याचे

आकाशासम धुंद बरसलो रचित दिनान्त दिगंती
माध्यान्हासम क्षालो दधी मज पिऊ दे शांत निवांती
मत्त चांदणे प्यालो त्यापरी घनतम गिळू दे आता
अगणित नक्षत्रांच्या द्वारे जड होई तो माथा..

धुवाधार मी प्रपात झालो जॆसा लक्ष स्वरांचा
जाऊनी उगमी भेदू दे मज स्थिरही मदिरी मॊनाचा
आनंदांकुर होऊन जॆसा आलो रुपाकारा
सुटूनी त्यातून घेऊ दे मज मूळ अरुप निवारा..

बा.भ.बोरकर..


१. हे गगना अल्बममधील श्रीधरजींनी संगीत दिलेले व स्वत: गायलेले हे गीत.. त्यांचा आवाज या गाण्यात सुधीर फ़डकॆ यांच्यासारखा वाटतो. पण बाज स्वतंत्र आहे. मला ही कविता आणि गाणे दोन्ही अतिशय प्रिय आहे.

संगीत सुरेख.. 'पिऊ दे शांत निवांती'.. मधला 'निवांतपणा' .. 'धुंवाधार प्रपाताचा' रोरावत येणारा आवाज.. 'आनंदांकुर' मधला खरोखर गवताचे वा-यावर डोलणारे पाते डोलावे तसा हेलकावा.. 'अगणित' शब्दातून निर्माण होणारा अगणितपणा.. संगीत, शब्दोच्चार व आवाज यांच्या साहाय्याने प्रकट होते.

'त्या नदीच्या पार वेड्या यॊवनाचे झाड आहे'.. किंवा 'जपानी रमलाची रात्र' अशा कविता लिहिणा-या बोरकरांची ही जरा तत्वज्ञानाकडे झुकणारी कविता..आपल्या पुलंनी त्यांच्यावर 'बाकीबाब : एक आनंदयात्री' असा अप्रतिम लेख लिहिलेला आहे.. त्यातून मला बोरकर प्रथम भेटले..

यज्ञी ज्यांनी देऊनी निज शिर.. घड्ले मानवतेचे मंदिर..
परि जयांच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती..
तेथे कर माझे जुळती..

या गाण्याने त्यांच्या कवितेशी परिचय वाढला.. ..

ही वरची कविता

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाचि अंत..

या ओळींसारखा आहे.. जीवनात चढावर सगळे खुष असतात.. वार्धक्य ..उतरता काळ कोणालाच नको असतो. तारुण्य भोगायचे सामर्थ्य मागावे लागत नाही.. पण विझण्यासाठी बळ मागावे लागते.. सगळ्या चांगल्या क्षणांमधे आपण कधीच मला हे सुख का लाभले ?.. असे विचारत नाही. दु:खात मात्र माझ्याच नशिबी हे का ? असे सह्ज म्हणतो..

मत्त चांदणे प्यालो त्यापरी घनतम गिळू दे आता..

या ओळीत तो अर्थ आला आहे..

आनंदांकुर होऊन जॆसा आलो रुपाकारा
सुटूनी त्यातून घेऊ दे मज मूळ अरुप निवारा..

यात मात्र सरळ अरूप म्हणजे देहाच्या पलीकडे जाण्याचे मागणे आहे. चॊ-याएंशी लक्ष योनींनंतर मानवाचे आयुष्य लाभते असे म्हणतात.. त्यामुळे सर्व संत महात्मे या जन्मानंतर जन्म मरणाच्या फ़े-यातून सुटका मागतात.. तेच मागणे बोरकरांनी यात मागितले आहे.. हे गाणे सुरु झाले की संपेपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते.. फ़ुलणे आणि विझणे श्रीधरजी अचूक उभे करतात

.असे विझण्याचे बळ मागणारा कवी एकीकडे..

तुला कसे कळत नाही फ़ुलत्या वेलीस वय नाही..
क्षितिज ज्याचे थांबले नाही त्याला कसलेच भय नाही..
त्याला कसलाच क्षय नाही त्याला कसलेच भय नाही...

असेही सहज लिहून जातो.. अशी क्षितिजाकडे द्रुष्टी असणा-यांना विझण्याचे बळ मागावे लागत नाही. ते मिळतेच.

No comments: