Tuesday, March 25, 2008

एक वेस ओलांडली..


एक वेस ओलांडली गाव एक दूर राहिले
एकट्याच वाटेस या दिशांनीच सांभाळले

इथेच मधेच क्षणॆक उगाच का मी थांबलो
सावलीत माझिया एकटा विसावलो
पुन्हा उन्हात चाललो
एक वेस ओलांडली गाव एक दूर चालले


उसासे फ़ुलांचे खुलासे सनांचे का मी ऎकतो
मातीच्या उरातल्या स्पंदनात गुंगतो पुन्हा मनात भंगतो
पावलास स्पर्श सांगतो गाव दूर दूर थांबले

संपल्या जुन्या खुणा जरी नवा ठसा दिसे प्रवासी पुन्हा
हाच खेळ संचिती असे
एक वेस ओलांडता गाव नवे दिसू लागले..


It is always important to know when something has reached its end. Closing circles, shutting doors, finishing chapters it doesnt matter what we call it; what matters is to leave in the past those moments in life that are over.

कोणतेही आयुष्यातील आवर्तन पूर्ण करण्याची वेळ आली आहे हे ओळखणे ..ते योग्यपणे पूर्ण करणे..आणि भूतकाळ मनातून काढून टाकून जगणे या तीन टप्पे हे गाणे विशद करते.

पण

बेनाम सा यह दर्द ठहर क्यूं नहीं जाता
जो बीत गया हॆ गुजर क्यूं नही जाता

अशी अवस्था भूतकाळातील कोणत्याही घटनेबद्दल सर्वांचीच असते.

आयुष्यातील एक प्रकरण संपवून या गाण्यातील प्रवासी दूर निघाला आहे. वाटेत उन आहे..आणि फ़क्त स्वत:ची सावली..जुन्या आठवणींनी क्षणभर थबकणे साहजिक आहे.पण पुढे निघणे तितकेच अपरिहार्य..

पण या जुन्या अनुभवाने 'तो' निराश झाला असला तरी हताश नाही.कळ्याफ़ुलांच्या हाका..मातीतून इवले लवलवणारे कोंब त्याला खुणावतात..आयुष्य जगण्यासाठी आहे या़ची एकीकडे प्रचीती येत असतानाच मनात ती दुखरी ठसठ्सती कळ उमटते..ह्रुदय भंगते..'तो' गाव दूर गेल्याची वेदनाच नुसती उरते.

नवीन काहीतरी हाका घालतंच..जरा प्रवास केल्यावर नवी वेस दिसते..नवीन घाव सोसण्यासाठी 'तो' परत एकदा सिध्द होतो.

अतिशय सकारात्मक द्रुष्टिकोन मांडणारं हे गाणं आहे. वरवर जरी मागे गेलेला गाव ही एक प्रेयसी वाटली तरी प्रत्यक्षात 'ती' शिक्षणाची संधी,नोकरी,हुकलेले काहीही असू शकते..किंवा कोणतेही नाते असू शकते. मागे काही गेले याची अवाजवी खंत न बाळ्गता आयुष्याचा प्रवास 'पुढची वेस' दिसेपर्यंत उमेदीने..सगळे क्षण 'जगत' चालू ठेवायचा असतो हे समर्पकपणे सांगणारे गीत.

श्रीधरजींनी गाण्यातून ही कविता आपल्यापर्यंत पोहोचविली आहे हे त्यांचे ऋण मानायला हवे.संगीत नेहमीप्रमाणेच योग्य.पहिल्या कडव्यात 'तो' निराश आहे हे आणि शेवटच्या कडव्यात 'सावरला' आहे हे उच्चारांच्या किमयेतून कसे कळते ते मुळातून अनुभवायला हवे.'क्षणॆक' मधे 'क्षण' थांबल्याचा भास होतोच. 'हाच खेळ संचिती असे' यात 'दॆव' याबद्दल एक हताशता जाणवेल असा 'संचित' हा शब्द कानावर येतो. एखाद्या लांबलचक बोगद्यातून प्रकाशकिरणाच्या टोकाकडे श्रीधरजीं आपल्याला या गाण्यातून प्रवास घडवितात.

हे गाणे ऎकताना निरनिराळ्या संदर्भात गुलजारचे 'मुसाफ़िर हू यारों' आठवतेच..विशेषत: 'एक राह रुक गयी तो ऒर जुड गयी' ही ओळ..

No comments: