Wednesday, March 26, 2008

फ़िटे अंधाराचे जाळे

फ़िटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश
दरीखो-यातून वाहे
एक प्रकाश प्रकाश !
रान जागे झाले सारे
पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी संगे
जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास..

दंव पिऊन नवेली
झाली गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने
आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास..

झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास..

सा-या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास... .

सुधीर मोघे

या गाण्याबद्दल मनात लिहावेसे खूप वाटत असूनही लिहिले नाही कारण श्रीधरजींची श्रवणीय परंतु रसिकांपर्यंत न पोहोचलेली गाणी निवडून त्याबद्दल लिहावे अशी इच्छा होती... कोणत्याही कार्यक्रमात फ़र्माईश होतेच ते हे गाणे.. या गाण्याबद्दल सर्वपरिचित गोष्टी म्हणजे..
१. हे लक्ष्मीची पाऊले या मराठी चित्रपटातील गाणे आहे.
२. हे सुधीर फ़डके व आशा भ्रोसले यांनी (अप्रतिम) गायले आहे.
३. मुलाच्या संगीतदिग्दर्शनाखाली वडिलांनी गायलेले गीत हे याचे अजून एक वॆशिष्ट्य..
४. यातील शेवटचे कड्वे चित्रपटातील प्रसंगाला अनुरुप नसल्याने ते द्वंद्वगीतात वगळले आहे...

गाणे म्हणून हे किती 'जमले' आहे.. ते त्याच्या लोकप्रियतेमुळे जाहीरच आहे.. पण गाणे झाले नसते तरी मूळ कविता अतिशय सकारात्मक दृष्टीकोन मांडणारी आहे.

अगदी वॆयक्तिक अशी एक आठवण माझ्यापाशी या गाण्याची आहे.. ..मनावर काजळी धरलेले काही अतिशय उद्विग्न क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात.. तसे ते माझ्याही आयुष्यात असतानाच्या काळात मी सिध्द समाधी योगाचा कोर्स केला. तो कोर्स करताना शेवट्चे चार दिवस आम्ही शांतिवन येथे गेलो होतो. मनात येईल ते गाणे म्हणा असे ठरले. खरे तर वेळ संध्याकाळची होती.. 'सांज ये गोकुळी' सारखे गाणे जास्त शोभले असते.. पण त्या वातावरणामुळे मनातला काळोख दूर झाला होता.. आणि माझ्या मनात हेच शब्द आले..
झाला आजचा प्रकाश
जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा
सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास

'फ़िटे अंधाराचे जाळे' या अल्बममध्ये हे स्वत: श्रीधरजींनी गायले आहे.. 'एक अनोखे लावण्य'.. किंवा 'सोनसळी अभिषेक' या शब्दातील 'चित्र' संगीत व सूर यांच्या साहाय्याने जिवंत झाले आहे..

सा-या रंगावर आली
एक सोनेरीशी झाक
भिडे काळजाला थेट
निळ्या क्षितिजाची हाक
तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास..
हे चित्रपटात नसलेले शब्द.. Our sweetest songs are those that tell of saddest thought. Percy Bysshe Shelley.. किंवा हवेहवेसे दु:ख तुला जर हवेच आहे नकोनकोसे हळवे कातर बोलू काही.. या दोन्हीतले ते 'हवेहवेसे दु:ख' या श्रीधरजींनी गायलेल्या गाण्यात उतरले आहे.. 'रंग किरमिजी' .. 'अवेळीच केव्हा दाटला अंधार' .. या गाण्यांमधून असेच दु:ख झिरपते.. दु:खी दर्दभरी .. हळवी गाणी संवेदनाशील मनांना एक वेगळा आनंद देऊन जातात.. असे स्वर आहेत तलत मेहमूद किंवा मेहंदी ह्सन यांचे..

'मन मनास उमगत नाही' ने एक अस्वस्थता निर्माण होते.. तर 'फ़िटे अंधाराचे जाळे' या गाण्याने जगण्याची नवीन उर्मी प्राप्त होते..

सुधीर मोघे.. सुधीर फ़ड्के.. आशा भोसले व श्रीध्रर फ़ड्के यांनी हे गाणे अजरामर केले आहे

1 comment:

Mahesh said...

Hey.. Really Nice Blog!!!
Very Good Collection!!
I have added your bloglink on my blog as Favourite.. :)
http://mimarathicha.blogspot.com