Saturday, July 12, 2008

श्रीधर फ़डके यांच्या गाण्यातील पाऊस.. २

ऋतू हिरवा, ऋतू बरवा, पाचूचा वनी रुजवा
युगविरही हृदयावर, सरसरतो मधूशिरवा
भिजूनी उन्हे चमचमती,
क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळया अवकाशी, मधुगंधी तरल हवा

मनभावन हा श्रावण,
प्रियसाजण हा श्रावण भिजवी तन,
भिजवी मन हा श्रावण
थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा

नभी उमटे इंद्रधनू,
मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा

गीत : शांता शेळके
संगीत : श्रीधर फ़डके
गायिका : आशा भोसले
अल्बम : ऋतू हिरवा

. ’ऋतू हिरवा’ ही कॅसेट आली तेव्हा एक लक्षात आले, ज्या ज्या मराठी घरात शेल्फ़मध्ये वरती सुधीर फ़डके यांचे गीतरामायण असते. तेथे शेजारी श्रीधर फ़डके यांच्या ऋतू हिरवा आवर्जून विराजमान झालेला असतो.प्रचंड गाजलेला हा अल्बम.. आशा भोसले यांनी या गाण्यांचे सोने केलेले आहे.

२. ’ऋतू हिरवा’ हे कायम हिरवेगार असणारे एक पावसाचे गाणे आहे. शांता शेळके यांचे शब्द अतिशय चपखल.. तोच चंद्रमा नभात, रेशमाच्या रेघांनी पासून अनेक गाणी त्यांनी दिली आहेत. या गाण्यात ’नितळ निळ्या अवकाशी, मदनाचे चाप जणू’.. हे शब्द किती सुरेख गायले गेले आहेत. सुधीर फ़डके यांच्या गायनाचे वॆशिष्ट्य म्हणून ’त्यांचे शब्द गाण्यात भाव घेऊनच उतरायचे’ असे नेहमी सांगितले जाते. तोच वारसा ऋतू हिरवा व श्रीधरजींच्या इतर अल्बममध्ये स्पष्ट जाणवितो. गगनाशी धरणीचा, जुळवितसे सहज दुवा .. ही कल्पना किती सुंदर आहे. एका कवितेत ’माझ्या मातीचे गायन तुझ्या आकाशशृतींनी जरा कानोसा देऊन कधी ऎकशील का रे.. अशी विनवणी . आणि पहिल्या पावसानंतर आकाश व धरतीचे मिलन दाखविणारे वरचे गाणे .. शब्दांचे सामर्थ्य दाखविणा-या दोन्ही कविता..

३. तर पाऊस..

आपण असतो
कुणी कुणाकुणाचे.
तसा पाऊसही....

पाऊस कधी जिवलग
कधी सखा कधी स्नेही
कधी दूरचा
कधी अगदी आतला अनाम....
नात्यातला.

कधी तोच असतो अनावर आवेग
कधी तोच असतो अचेतनाचा रंग
आणि अनेकदा
विशुद्ध पाऊसदेखील....

जगजीतने गायलेल्या एका गझल मध्ये हा पाऊस
बरसात का बादल तो आवारा हॆ क्या जाने
किस छतको भिगोना हॆ किस राहसे बचना हॆ.. असे आवारापन घेऊन येतो.

४. भिजूनी उन्हे चमचमती.. याचा प्रत्यय नुकताच कोकणात केलेल्या प्रवासात आला. कानाला लावलेल्या आयपॉडवर ’ऋतू हिरवा’ वाजत होतं.. बाहेर रिमझिम पाऊस… क्षण दिपती.. क्षण लपती.. याचा परत एकदा प्रत्यय आला.

५. थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा .. हाच आशय मांडणारी अजून एक कविता..

असे मृगाचे दिवस
धुंद कोसळे पाऊस
गर्द पोपटी रानात सखे हरवून गेले

वेळ जांभळी जांभळी
उन्हे चाफ़्यात लपली
रंग माखून हसले डोळा सांजस्वप्न झेले

झिरमिळती पालवी
वेल उसासली नवी
मॆनेसवे राघू बाई काही भलतेच बोले..

६. गाण्यातून सुध्दा भिजवी तन, भिजवी मन हा प्रत्यय देणारे गाणे. कितीही वेळा ऎकले तरी ते ’हिरवेगार’ सतेज, टवटवीत आहे.. श्रीधर फ़डके यांचे कविता निवडण्याचे, त्याला योग्य त्या चाली बांधण्याचे वेगळेपण, विलक्षण तन्मयता या त्यांच्या सुरूवातीच्या अल्बमपासून दिसते.